अंजनगाव सुर्जी खरीप बैठक:राजकारणामुळे शेतकरी संतप्त, अर्ध्यातूनच परतले; कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा, कृषी विभागावर प्रश्नचिन्ह
![]()
अंजनगाव सुर्जी येथे आयोजित खरीप हंगामपूर्व नियोजन बैठकीत कृषी मार्गदर्शनाऐवजी राजकीय चर्चा अधिक झाल्याने अनेक शेतकरी संतप्त होऊन बैठकीतून अर्ध्यातच निघून गेले. या प्रकारामुळे कृषी विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कृषी विभागामार्फत सिद्धेश्वर मंगलम येथे ही तालुकास्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. आमदार गजानन लवटे यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीचा उद्देश शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी तांत्रिक मार्गदर्शन करणे हा होता. तथापि, नियोजित सकाळी ९ वाजता सुरू होण्याऐवजी, आमदार उशिरा पोहोचल्याने कार्यक्रम सुमारे दोन तास उशिराने सुरू झाला. उशिरा सुरू झालेल्या या बैठकीत शेतकऱ्यांना अपेक्षित मार्गदर्शन न मिळता, राजकीय परिस्थितीवरच अधिक भाष्य केले गेले. सकाळपासून वाट पाहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी यामुळे नाराजी व्यक्त करत कार्यक्रम अर्धवट सोडून जाणे पसंत केले. विशेष म्हणजे, मंचावर शहरातील नगरसेवक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती होती, परंतु ग्रामीण भागातील उद्योगशील, प्रयोगशील आणि युवा शेतकऱ्यांना स्थान देण्यात आले नाही. पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनाही मंचावर स्थान मिळाले नाही. यामुळे बैठकीचे स्वरूप कृषी चर्चेपेक्षा राजकीय शक्तीप्रदर्शनाकडे झुकल्याचे स्पष्ट झाले. काही शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की, कृषी विभागाने ही बैठक केवळ औपचारिक कार्यक्रम पार पाडण्यासाठी आयोजित केली होती का? तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासाठी पुरेसा वेळ न देता राजकीय कार्यक्रमांना प्राधान्य दिल्याने बैठकीच्या मूळ उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. दोन कृषी तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांना आमंत्रित केले असतानाही, उद्घाटन, सत्कार आणि भाषणांमुळे त्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला. दरम्यान, बैठकीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना आवश्यक सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला माजी आमदार रमेश बुंदीले, तालुका कृषी अधिकारी श्रीमती जाधव यांच्यासह विविध पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
