महाराष्ट्रात पावसाची जोरदार एन्ट्री!:सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट, तर मुंबईकरांना मात्र करावा लागणार उकाड्याचाच सामना
![]()
अलनिनोचा प्रभाव आणि हवामान खात्याचे जुने अंदाज फेटाळून लावत महाराष्ट्रात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार चाहूल लागली असून, येत्या 3-4 दिवसांत राज्यातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनपूर्व वारे सक्रिय झाल्याने आकाशात काळ्या ढगांची गर्दी झाली असली, तरी मुंबईकरांना मात्र या पावसाचा आनंद लुटता येणार नाही. मुंबईत पावसाची दाट शक्यता नसल्याने तेथील नागरिकांना पावसाच्या सरींऐवजी दमट हवामान आणि वाढत्या उकाड्याचाच सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, 8 मे रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासह राज्यातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची दाट शक्यता आहे. प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा, सांगली, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून, हवामान विभागाने या भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर मुसळधार हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, आज आणि उद्या 8 मे रोजी कोल्हापूर, सातारा व पुण्याच्या डोंगराळ भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस हजेरी लावेल. पावसाच्या या संभाव्य धडाक्यामुळे अल निनो आणि सुपर निनोचा प्रभाव पूर्णपणे ओसरणार असून, प्रतिकूल हवामान स्थितीला निसर्ग चोख प्रत्युत्तर देईल अशी चिन्हे आहेत. मुंबईत दमट वातावरण राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली असली, तरी मुंबई आणि आसपासच्या परिसरात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसांत पावसाऐवजी केवळ दमट आणि उकाड्याचे वातावरण राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाट प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील तीन तासात हिंगोली, लातूर व छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (30 ते 40 की.मी.) राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
