"मजीप्रा'त ठिय्या; अभियंत्यांना नळ, पाइप, माठ दिला भेट:बांगड्या घालण्याचाही प्रयत्न; 5 दिवसांनी पाणी देण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन
![]()
उन्हाळा तीव्र होत असतानाच २५ दिवसांनंतरही पिण्याचे पाणी मिळत नसल्याने अकोला तालुक्यातील ग्रामस्थांनी बुधवारी आक्रमक पवित्रा घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी ग्रामस्थांना सोबत घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजीप्रा) कार्यालय परिसरात ठिय्या आंदोलन केले. पाण्यासाठी असलेले पाइप, नळ व माठ अभियंत्यांना भेट देत अनोख्या पद्धतीने पाणी मिळत नसल्याचा निषेध केला. अभियंत्यांना धारेवर धरत जाबही विचारला. आंदोलकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मजीप्राच्या अभियंत्यांनी गावनिहाय पाण्याचे नियोजन तेथेच जाहीर केले. आता पाच दिवसांनंतर सहाव्या दिवशी पाणीपुरवठा होणार आहे. ८४ गावे प्रादेशिक पाणीपुरवठायोजना मजीप्रातर्फे चालवण्यात येते. मात्र अनेक उर्वरित पान ४ अकोला तालुक्यातील खारपाणपट्ट्यात गोड पाण्याचे अन्य स्त्रोत नसून, प्रादेशिक व पूरक नळ पाणीपुरवठा योजनेवरच ग्रामस्थांना अवलंबून रहावे लागते. मुळात मजीप्राचे काम पाणीपुरवठा योजना तयार करणे आहे. योजना चालवणे, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी जिल्हा परिषदेची आहे. मात्र योजना परिपूर्ण नसल्याचे सांगत जि.प. सदस्य योजना ताब्यात घेत नाहीत. तसेच मजीप्रा कर्मचाऱ्यांचा अभाव आहे. देखभालीसाठी निधी नसल्याचेही म्हटले जाते. परिणामी ग्रामस्थांना पाणीपुरवठा वेळेवर व पुरेसा होत नाही. यापूर्वी शिवसैनिकांनी उग्र आंदोलनही केले. परिणामी त्यांच्यावर कारवाईदेखील झाली. अकोला पूर्व मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे. अकोला तालुक्यात शिवसेनेचेही प्राबल्य आहे. पाण्यावरून शिवसेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. अधिकारी म्हणतात, लग्नात पाणी विकत घ्या काही दिवसांपूर्वी गावात लग्न होते. त्यामुळे संबंधितांनी योजनेचे कर्मचारी, अभियंत्यांशी पाणी सोडण्याची विनंती केली. मात्र अभियंत्यांनी लग्नात लाखो रुपयांचा खर्च करता, तर पाणीही विकत घ्या, असा सल्ला दिल्याचे गोपाल दातकर म्हणाले. भूमीहीन असलेल्या मजुरांना पाणी विकत घेण्याचा सल्ला दिलाच कसा, असा सवाल करीत दातकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी अभियंत्यांना फैलावर घेतले.
