107 कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण स्थगित:घाेटी टाेलनाक्यावर नवीन कंत्राटदार नेमेपर्यंत नोकरी कायम ठेवण्याचे आश्वासन
![]()
मुंबई-आग्रा महामार्गावरील घोटी टोलनाक्यावरील कार्यरत असणाऱ्या १०७ स्थानिक कामगारांना कमी केल्यानंतर या कामगारांनी सुरू केलेले साखळी उपोषण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इगतपुरी नगरपरिषदेचे गटनेते फिरोज पठाण यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. घोटी टोलनाक्यावर नवीन कंत्राटदार येईपर्यंत सध्याचेच कामगार कायम ठेवण्याचे आश्वासन मिळाल्याने कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. घोटी येथील टोलनाका इगतपुरी एक्स्प्रेस हायवे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला चालविण्यास देण्यात आला होता. मात्र, आता हा करार संपुष्टात आल्यानंतर या टोलनाक्यावर गत १६ वर्षांपासून रुग्णवाहिका सेवा, रोड मेंटेनन्स, पेट्रोलिंग, अग्निशमन, हाऊसकीपिंग आणि क्रेन विभागात कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या रोजगारावर गदा येऊन कुटुंबांवर उपासमारीची वेळ ओढवली होती. दरम्यान, बुधवारी (दि. ६) पासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली होती. आधीच्या कंपनीचे कंत्राट संपल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असून, नवीन कंत्राटदाराने स्थानिक कामगारांना कायम ठेवावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. घोटी टोलनाक्यावरील कंपनीचे कंत्राट संपल्यानंतर कंपनीने ई-मेलद्वारे कामगारांना कामावर येऊ नये, असे कळवले. त्यामुळे १६ वर्षे सेवा देऊनही अचानक रोजगार गमावण्याची वेळ आल्याने कामगारांनी निर्णयाला विरोध करण्यासाठी साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारला.
