धीरेंद्र शास्त्रींना शिवरायांवरील वादग्रस्त विधान भोवणार!:तात्काळ कायदेशीर कारवाई करा, शिवप्रेमींची पोलिस आयुक्तांकडे तक्रार
![]()
दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या ऐतिहासिक विपर्यास, मानहानीकारक व भावना दुखावणारे वक्तव्याबद्दल भारतीय न्याय संहिता (बीएनएस 2023) व इतर कायद्या अन्वये त्यांच्यावर आणि स्वामी स्वरूपानंद यांच्यावर कायदेशीर कारवाईबाबत पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांना सकल मराठा समाज आणि समस्त शिवप्रेमींच्या वतीने ही तक्रार दाखल करण्यात आली. प्रा.डॉ.शिवानंद भानुसे यांनी निवेदन आणि तक्रारी बाबत जन आक्रोश कसा तीव्र झाला आहे हे नमूद केले. या तक्रारीबाबत सादरीकरण करताना अभ्यासक डॉ. राजेंद्र दाते पाटील यांनी सविस्तरपणे नमूद केले की, छत्रपती शिवाजी महाराज व सर्व महापुरुषांविषयी धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर धाम), स्वामी स्वरूपानंद व सर्व वाचाळविरांवर ऐतिहासिक विपर्यास, मानहानीकारक व भावना दुखावणारे वक्तव्याबद्दल भारतीय न्याय संहिता(बीएनएस 2023) व इतर कायद्या अन्वये कारवाई करण्यासाठी आमची ही तक्रार आहे. पुढे त्यांनी तक्रारीबाबत मांडणी करतांना नमूद केले की, मागील काही दिवसांपासून महापुरुषांच्या विरोधात केलेल्या विकृत विधानामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सदरील धीरेंद्र शास्त्री असोत किंवा इतर वाचाळवीर असोत, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रामध्ये वंदनीय असलेले सर्व महापुरुष यांच्या विरुद्ध केलेल्या विधानामुळे समस्त समाजात आणि जनसामान्यात अत्यंत रागाचे व चिड आणणारे वातावरण निर्माण झालेले आहे. तक्रारीत काय म्हटले आहे? या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पक्षीय, सर्व सामाजिक संघटना व सर्व शिवप्रेमी यांच्या वतीने अशी तक्रार करण्यात येते की, दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी नागपूर नगरीत सार्वजनिक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल खालील विधान केले: “शिवाजी महाराज अनेक लढाया लढून थकले होते… त्यांनी समर्थ रामदास स्वामींच्या पायाशी मुकुट ठेवला आणि म्हणाले ‘मी थकलो आहे, आपण राज्य सांभाळावे’…” सदर विधान हे पूर्णतः असत्य, काल्पनिक आणि इतिहासाचा विपर्यास करणारे आहे. तसेच वास्तवीक ऐतिहासिक व कायदेशीर आक्षेप असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराज कधीही “थकले” नव्हते. त्यांनी स्वराज्याची निर्मिती रयतेसाठी केली आणि ते अखेरपर्यंत सक्रिय होते. त्यांना थकलेले दाखवणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अवमान असून या वक्तव्यामुळे भारतीय न्याय संहिता 2023 च्या द्वेष पसरवणे, धार्मिक भावना दुखावणे आणि महापुरुषांची मानहानी करणे या अन्वये व इतर वक्तव्य हे गंभीर गुन्हे असून त्याच प्रमाणे धीरेंद्र शास्त्री, स्वामी स्वरूपानंद तसेच इतर वाचाळवीर यांच्यावर कठोर कारवाई करून यांना महाराष्ट्रामध्ये कुठलाही प्रवचन व इतर मार्गाने जाहीर कार्यक्रम घेण्याची परवानगी देऊ नये. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच युट्यूब व सोशल मीडियावरील सदर भाषणाचे आक्षेपार्ह व्हिडिओ व संबधित पोस्ट तात्काळ हटवण्यात यावी, अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. शासनाने व प्रशासनाने सदरील तक्रारीचा गांभीर्याने विचार करून महाराष्ट्रभर सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्वपक्षीय, सामाजिक संघटनासह व सर्व शिवप्रेमी व्यापक स्वरूपात मोठे जन आंदोलन करण्याच्या मनस्थितीत असून होणाऱ्या परिणामाची जबाबदारी शासनाची व प्रशासनाची असेल. पोलिस आयुक्तांकडून आश्वासन त्यामुळे करीता सदरच्या तक्रारीप्रमाणे गुन्हा नोंद होऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ही तक्रार स्वीकारावी, ही नम्र विनंती करण्यात आली असता पोलिस आयुक्त यांनी उपस्थित मान्यवरांना आश्वासित करताना नमूद केले की, मी स्वतः नागपूर पोलिस अधिकारी यांना बोलून तिथे काय व कसे गुन्हे दाखल केले याची माहिती संकलित करून कारवाईबाबत सध्यस्थीती ज्ञात करून घेतो आणि आपले म्हणणे शासनाकडे पाठवतो. या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपापले मत मांडले. ज्ञानेश्वर कणके यांनी पोलिस प्रशासनाने गांभीर्याने म्हणणे ऐकून घेतल्या बद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी पृथ्वीराजभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही तक्रार देण्यात आली त्या वेळेस डॉ.राजेंद्र दाते पाटील, प्रा. डॉ. शिवानंद भानुसे, प्रा. प्रदीप साळुंके, विजय काकडे धनंजय पाटील, सुरेश वाकडे, प्रा.चंद्रकांत भराट सुनील कोटकर सतीश वेताळ, किशोर चव्हाण,सखाराम काळे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा. डॉ. पी. एम. वाघ, राजीव थिटे, विष्णू चव्हाण, विधीज्ञा सुवर्णा मोहिते, हेमा पाटील, रेखा वहाटूळे, प्रा.डॉ. मनिषा मराठे, रेणुका सूर्यवंशी, कल्पना पाटील, तनश्री गायकवाड, डी. एम. पाटील, योगेश केवारे, मनोज गायके, मुकेश सोनवणे, सचिन मिसाळ, बाळासाहेब भगनुरे, सचिन हावळे, चंद्रकांत वराडकर, विनोद काकडे, किशोर दुबे वैभव बोडके, पंढरीनाथ काकडे, बबन गवारे, अमोल पाटील, रामदास नानवटे उत्तम लोकरे, रमेश तुपे, प्रकाश कावरखे, विकास पवार यांसह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
