रितू तावडेंना डोक्याचा भाग आहे का?:पदमुक्त झाल्यावर माझ्याच बाजूला बसतील, तेव्हा बघून घेईन; किशोरी पेडणेकरांचा इशारा
![]()
महिला अत्याचारांच्या वाढत्या घटनांवर संताप व्यक्त करावा तितका कमी. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आहे कुठे? लहान मुलींवरील अत्याचारांच्या घटनांवर सरकारच्या संवेदनशीलतेचा अभाव दिसून येतो, अशी टीका मुंबईच्या माजी महापौर व मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. तसेच त्यांनी महापौर रितू तावडे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यावर टीका करताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आनंदोत्सव साजरे करण्यात महापौर व्यस्त आहेत. त्यांना डोक्याचा भाग आहे का? स्वतःच्या महापौर कार्यकाळात 138 पुरस्कार मला मिळाले. रितू तावडे अडीच वर्षानंतर जेव्हा पदमुक्त होतील तेव्हा माझ्याच बाजूला बसतील तेव्हा त्यांना मी बघेनच, असा थेट इशाराच पेडणेकर यांनी दिला आहे. मीनाताई बाळासाहेब ठाकरे रुग्णालयात डिलिव्हरीचे प्रमाण गेल्या काही वर्षात घटले आहे, यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, यामागे संशयास्पद घडामोडी असल्याचा संशय आहे. कोविडनंतरही सेवा सुधारली नाही. आवश्यक डॉक्टरांची कमतरता असल्याचा मुद्दा गंभीर आहे. रात्री डिलिव्हरीसाठी रुग्णांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा डाव असल्याची शंका आहे. मीनाताई ठाकरे या नावामुळे राजकीय हेतूने दुर्लक्ष होत आहे का? असा सवालही पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. कोळी समाजावर दबाव टाकल्यास आंदोलन करणार तसेच पुढे बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, विरोधकांनी सभागृहाची कार्यपद्धती आणि शिस्त शिकावी. कोरम पूर्ण करावा. तसेच कोळी समाजावर दबाव टाकल्यास आंदोलन करणार असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. तसेच मुंबईतील मूळ रहिवासी म्हणून कोळी समाजाचा सन्मान राखावाच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ऑपरेशन टायगरवर बोलताना त्या म्हणाल्या, ऑपरेशन टायगर संदर्भात लोकप्रतिनिधींवर आर्थिक दबाव टाकला जात आहे. कोण कुठे जाईल, त्याला थांबवता येणार नाही. तसेच सत्ताधाऱ्यांकडून लोकप्रतिनिधींना काम करू दिले जात नसल्याची टीका पेडणेकर यांनी केली आहे.
