निवडणूक आयोग भाजपच्या 'पापाचा' भागीदार!:भारतात लोकशाही राहिली कुठे? निवडणुकांचे निकाल आता पाकिस्तान-रशियासारखे; राऊतांचा सवाल
![]()
पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमधील विरोधकांचा पराभव हा देशासाठी, लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. या देशात कोणत्याही राज्यात विरोधी पक्षाचे अस्तित्व ठेवायचे नाही, ही भूमिका ठेवत जर सत्ताधारी पक्ष काम करत असेल तर यापुढे विरोधकांनी लढायलाच नको, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. तर पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदार कापले जातात. मतदारांची संख्या कमी करत विजय मिळवला जातो त्या पापामध्ये निवडणूक आयोग सहभागी असतो, त्यानंतर उत्सव करतात. संजय राऊत म्हणाले की, काल ज्या निवडणुकांचे निकाल लागले त्या सारख्या निवडणुका या पाकिस्तान, रशियामध्ये होतात. अजरबैजानमध्ये निकालाच्या आधीच तिथे निकाल जाहीर होताना मी पाहिले आहे. भारतामध्ये सुद्धा त्याच पद्धतीने निवडणूक आणि लोकशाही जाताना दिसत आहे. महिला आरक्षणाचा विषय असता तर मग केरळमध्ये का भाजपला मतदान झाले नाही, तामिळनाडूमध्ये भाजपला का मतदान झाले नाही, तिथे नवीन पक्ष कसा निवडून आला? असा सवाल राऊत यांनी केला आहे. पंतप्रधान यांनी भान ठेवत बोलले पाहिजे. महिला आरक्षणाची इतकी चिंता होती तर ते कधीच झाले. तुम्हाला मतदारसंघ वाढवायचे आहे बाकी काही नाही. केरळमध्ये तामिळनाडूमध्ये तुमच्या पक्षाला का यश मिळाले नाही. लोकशाही जिंवत नाही संजय राऊत म्हणाले की, भाजपचे 365 दिवस केवळ एकच काम सुरू असते की निवडणूक कशा लढायच्या आणि जिंकायच्या बाकी देशात काय समस्या आहे याकडे त्यांचे काही लक्ष नसते असा टोला राऊत यांनी लगावला आहे. देशाच्या पंतप्रधानांनी जगात इतके काहीी सुरू असताना स्वत:ला 5 राज्याच्या निवडणुकीत झोकून दिले होते. गृहमंत्री एका राज्यात जाऊन राहतात. पैसा, सत्तेचा वापर करत निवडणूक जिंकली जाते. यामुळे कोण जिंकले हे महत्त्वाचे नाही. लोकशाही जिंवत नसली तरी हे असे निकाल लोकशाहीमध्ये स्वीकारत पुन्हा उभे राहायचे असते. ही मोदी सरकारच्या पतनाची सुरूवात संजय राऊत म्हणाले की, इंडिआ आघाडीचे भवितव्य अतिशय चांगले आहे. इंदिरा गांधी यांचा पराभव झाला त्याआधी देशातील सर्वच राज्यांमध्ये सत्ता प्रस्थापित केली होती. मोदी सुद्धा आज त्या सर्वोच्च टोकावर आहेत जिथे इंदिर गांधी होत्या. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षाचा झालेला पराभव ही मोदी यांच्या पतनाची सुरूवात आहे. दिवा विजताना त्यांची वात मोठी होते मग तो विजतो. हे हिंदुत्वाचे शास्त्र आहे हे मी हिंदुत्ववादी भाजपला सांगतो. मोदींनी खरे बोलण्याचे धडे घेतले पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये भाजप जिंकले आणि रुपया आणि शेअर बाजार घसरला. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या विषयी न बोललेले बरे.
