तीन बंधाऱ्यांची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत:पालकमंत्री ॲड. फुंडकर
![]()
प्रतिनिधी |अकोला जलयुक्त शिवार अभियान २.० द्वारे महाराष्ट्र राज्य टंचाईमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्धार आहे. चांगेफळ येथे मोर्णा नदीवर प्रस्तावित कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे गावासाठी सिंचनाची सोय निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी येथे केले. बंधाऱ्यांची कामे गुणवत्तापूर्ण व्हावीत, असेही ते म्हणाले. अकोला तालुक्यातील चांगेफळ येथे कोल्हापुरी पद्धत बंधाऱ्याचे भूमिपूजन, ग्रामपंचायत कार्यालय, पाणीपुरवठा टाकीचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी अमोल मस्कर आदी उपस्थित होते. असा होणार बंधारा चांगेफळ येथील बंधाऱ्याचे काम आमदार रणधीर सावरकर यांच्या प्रयत्नातून जलयुक्त शिवार २.० अंतर्गत मंजूर आहे. कामाची किंमत व मंजूर निधी १ कोटी ६४ लाख रूपये आहे. या बंधाऱ्याची लांबी २३ मीटर असेल. बंधाऱ्यावरील रस्त्याची रुंदी ३.५० मीटर व पाणीसाठ्याची उंची २ मीटर, बंधाऱ्यातील एकूण पाणीसाठा ९९.८८ स.घ.मी. असेल. सिंचन क्षमता २६ हेक्टर असेल. बंधाऱ्यातील गाळे संख्या ६ आहे.
