हिंगोलीत वीज कंत्राटदारांचे कामबंद आंदोलन:थकीत देयक तातडीने अदा करण्याची मागणी, देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची चिन्हे
![]()
हिंगोली जिल्ह्यात वीज कंपनीकडे असलेले सुमारे १० कोटी रुपयांचे देयक तातडीने अदा करावे यासह इतर मागण्यांसाठी इलेक्ट्रीकल कंत्राटदारांनी शुक्रवारपासून ता. १ कामबंद आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात वीज कंपनीची देखभाल दुरुस्तीची कामे ठप्प होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हिंगोली जिल्ह्यात इलेक्ट्रीकल कंत्राटदारांकडून वीज कंपनीच्या कामांच्या देखभाल दुरुस्तीसह रो्हित्र दुरुस्ती, वीज वाहिन्या अंथरणे, खांब उभे करण्याची कामे केली जातात. मात्र सदरील कामे केल्यांनतरही वीज कंपनीकडून देयकांसाठी तुटपुंजा निधी दिला जात आहे. त्यामुळे मागील दोन वर्षापासून कंत्राटदारांची तब्बल १० कोटी पेक्षा अधिक रकमेची देयके थकीत झाली आहेत. दरम्यान, सदरील देयका संदर्भात वीज कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही निधीचे कारण सांगितले जात आहे. तर वरिष्ठ पातळीवरून तुटपंुजा निधी दिला जात असल्याने कंत्राटादारांच्या देयकांची थकीत रक्कम दिवसें दिवस वाढत चालली आहे. या प्रकारामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या प्रकारामुळे इलेक्ट्रीकल कंत्राटदार संघटनेने शुक्रवारपासून ता. १ कामबंद आंदोलन सुरु केले आहे. यामुळे उच्चदाब वाहिनी, लघुदाब वाहिनी तसेच वितरण ट्रान्सफॉर्मर संदर्भातील सर्व प्रतिबंधात्मक व ब्रेकडाऊन कामे पूर्णपणे बंद पडली आहेत. यामुळे कामबंद आंदोलनाचा थेट परिणाम जिल्ह्यातील वीज पुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात वाढलेला वीज वापर आणि वादळी पावसाच्या पार्श्वभूमीवर देखभाल कामे बंद राहिल्यास नागरिकांना वीज खंडित होण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान, कंत्राटदारांची थकित बिले न मिळाल्याने दुरुस्ती साहित्य खरेदी करणे, कर्मचाऱ्यांचे वेतन देणे कठीण झाले आहे. त्यामुळे दर्जेदार काम करणे शक्य होत नाही. वीज व्यवस्था सुरळीत हवी असेल तर महावितरणने तातडीने थकित बिले अदा करावीत अशी मागणी त्यांनी केली आहे.
