हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८२.८६%:यंदा निकालाची टक्केवारी घसरली; काॅपीमुक्त अभियानाचा परिणाम, मुलींनीच मारली बाजी

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-05-02t14_1777711961.png




हिंगोली जिल्ह्याचा यावर्षी बारावीचा निकाल ८२.८६ टक्के लागला असून मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी निकालाची टक्केवारी ६ टक्क्यांनी घसरली आहे. कॉपीमुक्त अभियानामुळे निकालावर परिणाम झाल्याचे शैक्षणिक वर्तुळातून बोलले जात आहे. तर अपेक्षे प्रमाणे यावर्षीही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधून १४४९३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४१९८ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यामध्ये ३८३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून २५०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६५३७ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर २३३९ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. जिल्हातील एकूण ११७६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८२.८६ टक्के लागला आहे. मागील वर्षी बारावीचा निकाल ८८.५४ टक्के लागला होता. यावर्षी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रभारी शिक्षणाधिकारी आसावरी काळे यांच्या पथकाने कॉपीमुक्त अभियान राबविले. प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तैनात करण्यात आले होते. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसविण्यात आले होते. संवेदनशील परिक्षा वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु ठेवण्यात आला होता. दरम्यान, यावर्षीही अपेक्षे प्रमाणेत मुलींनीच निकालामध्ये बाजी मारली अाहे. या परिक्षेसाठी जिल्हयातील ७५९० विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी ५८३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ७६.८१ टक्के आहे. तर जिल्ह्यातून ६६०८ विद्यार्थीनींपैकी ५९३५ विद्यार्थीनी उत्तीर्ण झाल्या असून विद्यार्थीनींची टक्केवारी ८९.८१ टक्के एवढी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक ९२.८६ टक्के जिल्ह्यात विज्ञान शाखेत ७५४४ पैकी ७००६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून टक्केवारी ९२.८६ टक्के आहे. कला शाखेतून ५७७३ विद्यार्थ्यापैकी ४१०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७१.०५ टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेतून ६९५ पैकी ४९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ७१.७९ टक्के लागला आहे. तसेच किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमात १८६ पैकी १५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकाल ८४.९४ टक्के लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *