सुप्रिया सुळे 2 तास अडकल्या वाहतूक कोंडीत:मुंबई – पुणे महामार्गावर लोणावळा घाटात ट्रॅफिक जाम; VIDEO द्वारे कथन केला अनुभव
![]()
आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही या कोंडीचा फटका बसला आहे. त्या 2 तासांपासून या कोंडीत अडकल्यात. त्यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या कोंडीची व्यथा बोलून दाखवत आहेत. मुंबई – पुणे महामार्गावर दोन दिवसांपासून मानखुर्द येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यावेळी 15 मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी 5-6 तास लागत होते. या कोंडीचा फटका सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनाही बसला होता. त्यांनी एका व्हिडिओद्वारे हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा या एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली. त्याचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांना बसला. त्यामुळे त्यांना आज महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमालाही हजर राहता आले नाही. त्यांनी एका व्हिडिओद्वारे ही व्यथा कथन केली. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे आपल्या व्हिडिओत म्हणतात, नमस्कार, गेले दोन तास आम्ही सगळे वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. सकाळी 7 वा. आम्ही ठाण्यावरून निघालो, आता दोन तास गाडीत बसून आहोत. आता आमची आजुबाजूच्या लोकांसोबत मैत्रीही झाली आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता आम्ही सर्वजण वाहतूक कोंडीत अडकलो आहोत. यावेळी त्यांच्या बाजूला असलेल्या कारमधील प्रवाशांनीही सुप्रिया सुळे यांच्या व्हिडिओत आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्ही सुद्धा सकाळी 78 वाजता निघालो होतो. महाराष्ट्र दिन स्पेशल म्हणत नागरिकांनी या व्हिडिओद्वारे वाहतूक कोंडीवर भाष्य केले. व्हॉट्सएपवरही ठेवले स्टेटस सुप्रिया सुळे यांनी आपल्या व्हॉट्सएप स्टेटसवरही या वाहतूक कोंडीचे स्टेटस ठेवले आहे. त्यांनी या वाहतूक कोंडीचे फोटो व व्हिडिओ आपल्या स्टेटसवर शेअर करत मुंबई – पुणे रोड असे लिहून हात जोडल्याचा इमोजी वापरला आहे. याद्वारे त्यांनी एकप्रकारे हतबलता व्यक्त केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे सकाळी 7 वा. ठाण्यावरून पुण्याच्या दिशेने निघाल्या. पण रस्त्यात लोणावळा लगतच्या घाट परिसरात त्या ट्रॅफिक जाममध्ये अडकल्या. अरुंद रस्त्यामुळे या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होरत्या. का झाली वाहतूक कोंडी? आज मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिसिंग लिंकचे उद्घाटन होणार आहे. हा कार्यक्रम व सुट्ट्यांमुळे पर्यटकांच्या वाढलेल्या संख्येमुळे या महामार्गावर सकाळपासूनच वाहनांची प्रचंड गर्दी होती. घाटातील अरुंद रस्ता व वाहनांची वाढलेली संख्या यामुळे वाहनांचा वेग मंदावला ही वाहतूक कोंडी झाली. सध्या वाहतूक पोलिस ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. उन्हाचे चटके अन् गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले सलग सुट्ट्यांमुळे घाटात मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. आज सकाळपासून अनेक प्रवासी घाटात अडकलेत. प्रवाशांकडे पिण्यासाठी असलेले पाणीही संपले आहे. त्यातच या ठिकाणी अडकलेल्या लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांनाही आता कडक उन्हाचा त्रास होऊ लागला आहे. खालापूर टोलनाक्यापासूनच ट्रॅफिकला सुरूवात झाली. मुंबईकडून पुण्याकडे येणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी 25-25 मिनिटांचे ब्लॉक घेतले जात आहेत. या कोंडीमुळे महामार्गावर अनेक गाड्या बंद पडल्या. अनेक वाहनचालकांनी येथील फूड मॉलवर थांबणे पसंत केले. पण आता फूड मॉलची पार्किंगही संपली आहे. या सर्वात इलेक्ट्रिक वाहनधारकांची गोची होण्याची शक्यता आहे.
