अंबादास दानवेंकडून उमेदवारी अर्ज दाखल:फडणवीसांचे ऐकून गुवाहटीला गेले, आता शिंदेंचे ऐकून गेले; बच्चू कडूंवर दानवेंचा टोला
![]()
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आज भरला. त्यानंतर माध्यमांना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाविकास आघाडीच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आली असल्याचे दानवे यांनी सांगितले. अंबादास दानवे म्हणाले, सर्व पक्षांच्या एक मताने माझा फॉर्म भरला. निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत आहे. नाराजी नाही, आमची आघाडी आहे. काही गोष्टींची स्पष्टता येणे कॉंग्रेसची भूमिका होती, असेही दानवे यांनी म्हटले. यावेळी बोलताना दानवे यांनी बच्चू कडू यांच्यावर टीका करत म्हटले की, राजकारणात मिनिटा मिनिटाला गणिते बदलत असतात. बच्चू कडू यांना गुवाहटीला जाऊन 4 वर्षे झाली आहेत, तेव्हा फडणवीस यांनी सांगितले म्हणून गेले. आता ते शिंदेंचे ऐकून गेलेत, असा टोला दानवे यांनी लगावला आहे. पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते, कॉंग्रेसचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष यांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला सूचना दिली आहे, त्याप्रमाणे आम्ही काम करत असल्याची भूमिका कॉंग्रेसने मांडली आहे. प्रदेशाध्यक्ष आणि चेन्निथला यांच्यात लवकरच या संदभात बैठक होईल. तसेच पाच सहा वर्षांपूर्वी नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला, तसा बच्चू कडू यांनी केला असेल, असेही दानवे म्हणाले. दरम्यान, आगामी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या दोन जागांपैकी एका जागेवर दावा करण्याच्या काँग्रेसच्या अटीला उद्धव ठाकरेंनी मंजुरी दिल्यानंतरच काँग्रेसने अंबादास दानवेंना पाठिंबा दिल्याचे सूत्रांकडून समजते. या राजकीय करारानुसार विधान परिषदेची एक जागा ठाकरे गटाला मिळणार असल्याचे निश्चित झाले असले, तरी काँग्रेसने राज्यसभेच्या जागेवर केलेल्या दाव्यामुळे खासदार संजय राऊत यांच्या फेरनिवडीत तांत्रिक अडचण किंवा पेच निर्माण होण्याची शक्यता आता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
