अखेर महाविकास आघाडीतील पेच सुटला:काँग्रेसचा अंबादास दानवेंना पाठिंबा, विधान परिषदेला उमेदवार देणार नाही; हर्षवर्धन सपकाळांची घोषणा
![]()
विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष आणि नाराजीनाट्य अखेर संपुष्टात आले आहे. काँग्रेसने आपला स्वतंत्र उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला असून, शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे. आज पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही अधिकृत घोषणा केली. सकाळपर्यंत काँग्रेस स्वतंत्र उमेदवार देणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, दुपारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार, मते विभागली जाऊ नयेत आणि महायुतीला फायदा होऊ नये, यासाठी काँग्रेसने माघार घेण्याचे ठरवले. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, “आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. अंबादास दानवे हे आमचे संयुक्त उमेदवार असतील.” भविष्यातील जागांचे ‘बार्टर’ समीकरण काँग्रेसने ही माघार काही अटी आणि भविष्यातील गणितांवर आधारित घेतली आहे. याबद्दल माहिती देताना सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “आज आम्ही शिवसेनेला (UBT) पाठिंबा दिला असला तरी, आगामी राज्यसभा निवडणूक आणि त्यापुढील विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला जागा सोडण्याबाबत आघाडीत एकमत झाले आहे. या तडजोडीनंतरच आम्ही हा निर्णय घेतला आहे.” अंबादास दानवेंचा मार्ग सुकर उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर होते. मात्र, आता काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे दानवे यांचा विजय सुकर मानला जात आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
