शक्तीपीठ महामार्गाविरोधात रांजाळा शिवारात आंदोलन:जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांत 22 जणांवर गुन्हा दाखल
![]()
औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा शिवारात पत्रादेवी ते पवनार या सुमारे ८०० किलो मिटर अंतराच्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात २२ जणांवर बुधवारी ता. २९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लागू असलेल्या जमाबंदीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रादेवी ते पवनार हा सुमारे ८०० किलोमिटर अंतराचा शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे. या महामार्गासाठी जमीन सपांदीत केली जात आहे. मात्र अनेक ठिकाणी जमीनी सुपीक असून त्या ठिकाणी बागायती पिके घेतली जातात. तर काही ठिकाणी अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या जमीनी संपादीत होणार असल्याने या शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधनच राहणार नसल्याची भिती व्यक्त होत आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हयात या महामार्गाला जमीन देण्यास शेतकऱ्यांतून मोठा विरोध केला जात आहे. जमीन न देण्याची आंदोलकांची भूमिका दरम्यान, औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा शिवारात ता. २८ एप्रील रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास काही जणांनी सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन केले. कुठल्याही परिस्थितीत या महामार्गाला जमीन दिली जाणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. त्यानंतर प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले. २२ आंदोलकांवर गुन्हा दाखल दरम्यान, यावेळी या वेळी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याची तक्रार जमादार दिलीप नाईक यांनी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात दिली. यावरून पोलिसांनी पुष्पक देशमुख, संदीप माटेगावकर, किशोर ढगे, दीपक सोनुने, अनिल चव्हाण, राजू वैद्य, दिलीप वैद्य यांच्यासह इतर १० ते १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार राजेश ठाकूर पुढील तपास करीत आहेत.
