नातीच्या लग्नाच्या दिवशीच आजोबांचामृत्यू, दुःख बाजूला ठेवून वधूची पाठवणी:सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील हृदयद्रावक घटना
![]()
प्रतिनिधी | घाटनांद्रा आनंद आणि उत्साहाने भरलेल्या लग्नसोहळ्याला अचानक दु:खाची किनार लागल्याची हृदयद्रावक घटना घाटनांद्रा येथे मंगळवारी घडली. येथील माधवराव रामदास तायडे यांची कन्या गायत्री हिचा विवाह मंगळवारी (२८ एप्रिल) ठरलेल्या मुहूर्तावर सायंकाळी पार पडला. मात्र याच दिवशी तिचे आजोबा रामदास तायडे (७७ ) यांचे निधन झाल्याने संपूर्ण तायडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. रामदास श्रीपत तायडे हे मागील आठवड्यापासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून काही दिवसांपूर्वी घरी आणण्यात आले होते. घरीच त्यांच्या प्रकृतीची काळजी घेतली जात असताना, नातीच्या लग्नाच्या दिवशीच दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान, एकीकडे घरात लग्नाची लगबग, तर दुसरीकडे अचानक आलेले दुःख – अशा द्विधा परिस्थितीत तायडे कुटुंब सापडले. वडिलांच्या निधनाचे दु:ख मनात दडवून ठेवत, माधवराव तायडे व त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या धैर्याने लेकीचा विवाह विधी पूर्ण केला.
