मंत्री प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया:भाजप आमदार नरेंद्र मेहता यांचा आरोप; कासारवडवली पोलिस ठाण्यात दाखल केली तक्रार
![]()
भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी सोमवारी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सरनाईकांवर भाईंदर पाडा येथील एक महत्त्वाचा भूखंड लाटल्याचा आरोप केला आहे. त्यांनी या प्रकरणी अत्यंत आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आमदार नरेंद्र मेहता यांनी रविवारी एका फेसबुक पोस्टद्वारे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भूखंड लाटल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, भाईंदरपाडा येथील गंगाधर भाऊ भोईर, सुमती गोविंद तंगडी, शांताबाई मोतीराम भोईर, रामचंद्र मोतीराम भोईर, मनोहर मोतीराम भोईर, दिपा अजय म्हात्रे, हितेश रमेश भोईर, मोहिनी रमेश भोईर या भूमिपुत्र बांधवांच्या 2439 चौ. मीटर पैकी 1219 चौ. मीटर जमीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक व त्यांच्या गुंडांकडून बळकावण्यात आल्याची बाब समोर आली आहे. हा केवळ जमिनीचा प्रश्न नसून, आपल्या हक्कांचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. नरेंद्र मेहता यांनी या अन्यायाविरोधात ठोस पाऊल उचलण्यासाठी आपल्या समर्थकांना सोमवारी सकाळी 11 वा. मिरा भाईंदर येथील भाजप जिल्हा कार्यालयात जमण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आज दुपारी त्यांनी आपल्या समर्थकांसह कासारवडवली पोलिस ठाण्यात जाऊन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यांच्या या भूमिकेमुळे मिरा – भाईंदर परिसरात पुन्हा एकदा राजकीय वादाला तोंड फुटले आहे. प्रताप सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया – मेहता नरेंद्र मेहता यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री प्रताप सरनाईक हे सर्वात मोठे भूमाफिया असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, प्रताप सरनाईक मराठी माणूस मोठा झाला पाहिजे असे म्हणतात. पण त्यांच्या कथनी अन् करणीत मोठा फरक आहे. ते गावातील भूमिपूत्रांना स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी बेघर करत आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अशा लोकांमुळे सरकारचे नाव खराब होत आहे. सरनाईक सर्वात मोठे भूमाफिया आहेत. ते आतापर्यंत हेच काम करत आलेत. त्यांच्याविरोधात ठाण्यात अनेक तक्रारी आहेत. मिरा भाईंदरमध्येही ते तेच करत आहेत. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मंत्री सरनाईकांची अद्याप प्रतिक्रिया नाही दुसरीकडे, या गंभीर आरोपांविषयी मंत्री प्रताप सरनाईक किंवा त्यांच्या कार्यायाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या आरोपांवरील त्यांची बाजू समजू शकली नाही. पण गत महिन्यांपासून सरनाईक व मेहतांमध्ये सुरू असलेला वाद आता थेट पोलिस ठाण्यात पोहोचल्यामुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. सरनाईकांचेही नरेंद्र मेहतांकडे बोट उल्लेखनीय बाब म्हणजे प्रताप सरनाईक यांनी नुकताच भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची मिरा भाईंदर शहरात तब्बल 30 टक्के जागा असल्याचा एका व्हिडिओत उल्लेख केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. या प्रकरणी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्यानंतर त्यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले होते. ते म्हणाले होते, राज्य शासनाकडून मिरा-भाईंदर शहरात विविध प्रकल्प राबवले जात आहेत. यामध्ये सूर्या पाणीपुरवठा योजना आणि मेट्रो प्रकल्पाचा प्रमुख समावेश आहे. मात्र, सूर्या योजनेचे काम करताना प्रशासनाला नरेंद्र मेहता यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या सेव्हन इलेव्हन संस्थेच्या जागेची अडचण येत आहे. त्यामुळे या योजनेचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले होते. मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे कामही या संस्थेमुळे थांबले असल्याचे सांगण्यात आले. शासकीय प्रकल्प राबवताना वारंवार त्यांच्या जागेमुळे अडथळा येत असल्याने हा मुद्दा मी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी तसे विधान केले होते. पण त्यानंतर झालेले आरोप प्रत्यारोप चुकीचे होते. आपण सुसंस्कृत असल्यामुळे हा विषय सोडून दिला होता, असे ते म्हणाले होते.
