अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू, महाविद्यालयांचा डेटा शासनाकडे:विद्यार्थ्यांकडून नोंदणी सुरू, शाळांमध्ये प्रक्रिया वेगाने
![]()
सन २०२६-२७ साठी अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागण्याआधीच सुरू झाली आहे. शासनाच्या निर्देशानुसार, जिल्हाभरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माध्यमे आणि माध्यमनिहाय जागांची संख्या शासनाला कळवली आहे. त्याचबरोबर, शाळांनीही विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली असून, त्यातील पहिला टप्पा बहुतांश शाळांनी पूर्ण केला आहे. सन २०२५ पर्यंत अमरावती महापालिका क्षेत्रापुरती मर्यादित असलेली अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया गतवर्षीपासून संपूर्ण जिल्ह्यासाठी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाभरातील कनिष्ठ महाविद्यालयांनी शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कला, वाणिज्य, विज्ञान, एसीव्हीसी आणि व्होकेशनलच्या जागा ऑनलाईन पोर्टलद्वारे कळविल्या आहेत. दुसरीकडे, जिल्हाभरातील शाळांनी यावर्षी (फेब्रुवारी-मार्चमध्ये) दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू केली आहे. ऑनलाईन प्रवेश समितीच्या निरीक्षणानुसार, महाविद्यालयांना त्यांच्याकडील उपलब्ध जागांची माहिती योग्य त्या दुरुस्त्यांसह २४ एप्रिलपर्यंत द्यायची होती. त्यानुसार, जवळपास सर्वच कनिष्ठ महाविद्यालयांनी एक्सेल शीट आणि गुगल लिंकचा वापर करून त्यांच्याकडील डेटा शासनाकडे पाठवला आहे. शाळांनी फोनद्वारे संदेश पाठवून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना नोंदणीसाठी बोलावले आहे. ही नोंदणी प्रक्रिया अगदी प्राथमिक स्वरूपाची आहे. दहावीचा निकाल घोषित झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांना हवे असलेले माध्यम व महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. त्यामुळे कला, वाणिज्य, विज्ञान, व्होकेशनल, एमसीव्हीसी यांसारख्या शाखा आणि त्यानुसार महाविद्यालयांचा पसंतीक्रम दर्शविण्याचे टप्पे दहावीच्या निकालानंतरच पूर्ण केले जातील. शिक्षण उपसंचालक, अमरावती, नीलिमा टाके-गुल्हाणे यांनी सांगितले की, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील डेटा पाठवताना आवश्यक ते पुरावे जोडणे अनिवार्य आहे. नवीन तुकडी, बायफोकलची मान्यता, आयटी विषयाची मान्यता, फी वाढ याबाबत त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कागदपत्रे जोडावीत. तसेच, जर काही बदल होत असेल तर त्याचे पुरावेही जोडणे आवश्यक आहे.
