राऊतांना स्वतःची जागा वाचवण्यासाठी ठाकरेंचा पत्ता कट करायचा आहे:विधान परिषद ठाकरेंना, तर राज्यसभा काँग्रेसला असे सपकाळांनी ठणकावले- नवनाथ बन
![]()
मविआमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू आहे. काल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जात सांगितले की आता विधान परिषद तुम्हाला हवी असेल तर येणाऱ्या राज्यसभेचा निर्णय आताच घ्यावा लागेल. विधान परिषद जर तुम्हाला हवी असेल तर येणारी राज्यसभा काँग्रेसला द्यावी लागेल असे त्यांनी ठणकावत सांगितले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, विधान परिषद जर उद्धव ठाकरे यांना दिली तर संजय राऊत यांची राज्यसभेची जागा रिकामी होईल त्यावर काँग्रेसने दावा केला आहे. म्हणून उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाऊ नयेत यासाठी संजय राऊत प्रयत्न करत आहेत. आपला पत्ता कट होऊ नये यासाठी ते उद्धव ठाकरेंचा पत्ता कट करण्याच्या प्रयत्नात आहेत. सपकाळ यांनी सवाल केला आहे की आम्हाला संधी कधी मिळणार? आम्ही काय केवळ पाठिंबाच द्यावा का? यामुळे उबाठात राऊत VS ठाकरे असा वाद सुरू झाला आहे. राऊत काँग्रेसमध्ये जाणार नवनाथ बन म्हणाले की, मविआमध्ये पुढील राज्यसभेची जागा काँग्रेसला सुटणार असल्याने संजय राऊत काँग्रेसकडून राज्यसभेवर जाण्याचे प्रयत्न सुरू आहे. एकतर उद्धव ठाकरेंचा पत्ता कट करायचा नाही तर उबाठा सोडून काँग्रेस प्रवेश करत खासदारकी मिळवण्याचा प्रयत्न राऊत यांच्याकडून सुरू आहे.संजय राऊत यांना काँग्रेस रत्न पुरस्कार दिला पाहिजे. कारण काँग्रेसमध्ये राहुल गांधी सुद्धा जेवढी बाजू मांडत नाही तेवढी चांगली बाजू राऊत मांडत असतात. ते खातात उबाठाचे आणि गातात काँग्रेसचे असा टोला बन यांनी लगावला आहे. त्यांच्याकडे काँग्रेस नेतृत्व दिले तर काँग्रेसला अच्छे दिन येऊ शकतात. रश्मीताईंना पक्षप्रमुख करणार का? नवनाथ बन म्हणाले की, महिलांना लोकसभेत 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयत्न केले. पण त्याला काँग्रेस, उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि विरोधकांनी विरोध केला. महिला मुख्यमंत्री, महिला पंतप्रधान असे प्रश्न विचारण्यापेक्षा तुम्ही 2019 मध्ये रश्मी ठाकरेंना संधी का दिली नाही? आता पक्षप्रमुख म्हणून आदित्य ठाकरेंचे नाव घोषित न करता रश्मी ठाकरेंचे नाव घोषित करणार का? तुम्ही सातत्याने महिलांचा अपमान करतात. तुमच्या कार्यकर्त्यांकडून पाटकर ताईंना धमक्या दिल्या जात आहे, त्यांचे पुस्तक समोर येऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहे. देवाभाऊंच्या राज्यात कोणत्याही महिलेला त्रास होऊ देणार नाही.
