संपामुळे विवाहासाठी आलेले उपवर-वधू बसले ताटकळत:नातेवाइक, परिचितांनी जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मुद्दा पाेहाेचल्यानंतर नोंदणीचा आदेश पारित
![]()
संपामुळे नोंदणी विवाहासाठी आलेल्या उपवर-वधूला मनस्ताप सहन करावा लागला. काही वेळ त्यांना ताटकळत बसावे लागले. दोघांसह अन्य नातेवाईक व परीचित जिल्हाधिकाऱ्यांपर्यं त पोहोचले. त्यानंतर सूत्र वेगाने फिरली आणि नंतर दोघांचा शुभ विवाहही पार पडला.
.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमधील गोविंद लांडे (बार्शी) यांचा विवाह अकोल्यातील बंडूसा घाटोळे यांची कन्या हर्षदा यांच्याशी ठरला. या विवाहासाठी अकोल्यातील सह जिल्हा निबंधक कार्यालयात दीड महिना आधीच नोंदणी करण्यात आली होती. नोंदणी विवाहसाठी २१ एप्रिल तारीख देण्यात आली. मात्र कर्मचारी संपावर असल्याने या लग्नाची नोंदणी होऊ शकत नव्हती. बार्शीतून आलेले वऱ्हाड दिवसभर ताटकळत होते. मानसिक ताण निर्माण झाला होता. उपवर-वधू पक्षातील मंडळीसह विवाह जुळवण्यासाठी पुढाकार घेणारे भावसार समाजाचे विदर्भ अध्यक्ष कॉ. अनिल मावळे यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर सह दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांपर्यंत विवाह नोंदणीचा आदेश पोहोचवण्यात आला. या विभागातील ३४ पैकी २४ कर्मचारी संपात सहभागी झाले होते. अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांवर विभागातील कारभाराची जबाबदारी होती. अखेर संप, प्रशासनातील अडथळे आणि ताणतणाव यावर मात करत हा विवाह पार पडला. संप काळातही एक सकारात्मक संदेश यानिमित्ताने समाजात गेला.
…अखेर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार
