'वन पार्टी, नो इलेक्शन'कडे देशाची वाटचाल:आमदार-खासदारांचा हमीभाव ठरलाय, शेतकऱ्याचा नाही! उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल




“तीस वर्षे भाजपसोबत राहून आम्ही भाजपमध्ये विलीन झालो नाही, तर काँग्रेसमध्ये काय विलीन होणार? उलट मला भीती वाटते की, महाराष्ट्र भाजपच आता ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल,” अशा जळजळीत शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगितले. शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त (हिरक महोत्सव) मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदार, काँग्रेस विलीनीकरणाची अफवा, भाजपचे हिंदुत्व आणि ठाकरे कुटुंबावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवरून अत्यंत आक्रमक आणि भावनिक भाषण केले. त्यांच्या या झंझावाती भाषणातील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहेत: 1. “काँग्रेसमध्ये नव्हे, भाजपच ‘मिंधेसेनेत’ विलीन होईल” गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा पेरल्या जात आहेत. यावर सडेतोड उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “शिवसेना कधीही कुणात विलीन होत नसते. काँग्रेससोबत आपले टोकाचे वैर होते, पण त्यांनी कधी ‘मातोश्री’वर डोळे वटारले नाहीत. भाजपने मात्र शिवसेनेला मुळासकट उपटून काढण्याचा प्रयत्न केला.” भाजपला टोला लगावताना ते म्हणाले, “भाजपचे निष्ठावान नेते आता दिल्लीच्या आदेशामुळे मिंधेंची दाढी खाजवत आहेत.” 2. “तुमच्या विचारांच्या वांझोटेपणावर उपचार करा” भाजपच्या ‘फोडाफोडीच्या’ राजकारणावर कडाडून टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपचे दोन तृतीयांश खासदार बाहेरचे आहेत. तुम्हाला राजकारणात पोरं होत नाहीत, म्हणून आमची पोरं का पळवताय? तुमच्या विचारांच्या वांझोटेपणावर आधी उपचार करा.” बंडखोरांना सुनावताना ते म्हणाले, “प्रत्येक लोकसभेत मी ६ ते १० सभा घेतल्या तेव्हा हे निवडून आले. खरी किंमत उद्धव ‘बाळासाहेब’ ठाकरे या नावाला आहे, पारंब्यांना नाही.” 3. ‘मातोश्री’ आणि कुटुंबावरील ट्रोलिंगवर संताप ठाकरे कुटुंबावर (पत्नी रश्मी, आदित्य आणि तेजस) होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवर उद्धव ठाकरे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “मातोश्रीवर शिंतोडे उडवणारी ही कुठली औलाद आहे? ज्या शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाच्या रक्तात स्वाभिमान रुजवला, त्या रक्तात ही भेसळ कुठून आली? छत्रपती शिवाजी महाराज, फुले-आंबेडकर आणि प्रबोधनकारांनाही असा त्रास सहन करावा लागला होता.” 4. निवडणूक जिंकण्यासाठी सुरक्षा दलांचा गैरवापर “सरदार वल्लभभाई पटेलांनी देशात प्रांत आणण्यासाठी रझाकारांवर पोलीस कारवाई केली होती. पण यांनी बंगालमध्ये एका महिलेला हरवण्यासाठी दोन-अडीच लाख पोलीस घुसवले. पक्ष फोडायला तुम्ही देशाचे सुरक्षा दल वापरता? हेच बळ मणिपूर किंवा पाकव्याप्त काश्मीरमध्ये का घुसवले नाही?” असा थेट सवाल ठाकरेंनी विचारला. 5. देशाला वाचवण्यासाठी ‘ऑपरेशन कमळ’ करावे लागेल “आजकाल चोरी पकडली की चोर त्याला ‘ऑपरेशन’ म्हणतात,” असा टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले की, “जर सत्ताधारी असे ‘ऑपरेशन’ करत असतील, तर आता देशाला वाचवण्यासाठी आपल्याला मिळून ‘ऑपरेशन कमळ’ (भाजपवर शस्त्रक्रिया) करावे लागेल. ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून यांची वाटचाल ‘वन पार्टी, नो इलेक्शन’कडे सुरू आहे. ज्या देशात तरुणाईला ‘झुरळ’ मानले जाते, त्या देशाचे भविष्य काय असणार?” 6. शेतकऱ्यांना अटी आणि खासदार खरेदीला सवलती? शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरताना उद्धव ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना हजारो अटी लादल्या जातात. पण आमदार आणि खासदार विकत घ्यायला तुमच्याकडे कोणतीही अट नाही? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, पण आमदार-खासदारांचा हमीभाव मात्र ठरलेला आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेतही 80 लाख महिलांना अपात्र ठरवले गेले.” 7. 6 खासदारांच्या निर्णयाने पक्षाचे विलीनीकरण होत नाही उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या खासदारांच्या कायदेशीर वैधतेवर त्यांनी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. “दहाव्या अनुसूचीनुसार स्वतःहून पक्ष सोडणारा अपात्र ठरतो. केवळ ६ लोकांच्या मतानुसार पक्षाचे विलीनीकरण होत नाही, त्यासाठी पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम असतो,” हे त्यांनी स्पष्ट केले. 8. “मला नेतृत्वाची हाव नाही” भाषणाच्या शेवटी शिवसैनिकांना अत्यंत भावनिक साद घालत उद्धव ठाकरे म्हणाले, “संकटामागून संकटे येतील, पण शिवसैनिक सोबत असेपर्यंत मी डगमगणार नाही. पण जर तुम्हाला कोणा लाचार माणसाने केलेले आरोप खरे वाटत असतील, तर मला नेतृत्वाची कोणतीही हाव नाही, मी आत्ता पायउतार व्हायला तयार आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *