मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

[ads1]

खेलेगा भारत, जितेगा भारतच्या घोषवाक्यासह ४५० खेळाडूंचा सामुदायिक रॅलीत सहभाग

नांदेड(जिमाका) –  महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या अतुलनीय क्रीडायोगदानाची स्मृती जपण्यासाठी तसेच युवकांमध्ये खेळ व क्रीडा संस्कृतीची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन नांदेड जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन तसेच विविध एकविध क्रीडा संघटनांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त २९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सत्रात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उपस्थित खेळाडूंना क्रीडा शपथ देण्यात आली. सायंकाळच्या सत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांनी खेळाडू व प्रशिक्षकांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. “मैदान आपली वाट पाहत आहे. तुमची मेहनत आणि जिद्द दाखवा. जिंकलात तर विनम्र राहा आणि हरलात तर अधिक शिकून पुन्हा मैदानावर उतरा,” असे आवाहन त्यांनी केले. तसेच कुटुंबीय व मित्रांना दररोज एक तास खेळ आणि फिटनेस उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद दल, नांदेड कॅम्पचे पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त जिल्हा क्रीडा अधिकारी गंगालाल यादव, सेवानिवृत्त क्रीडा अधिकारी किशोर पाठक, नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. इम्तियाज खान, उपाध्यक्ष विनोद गोस्वामी, सचिव रवी बकवाड, राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, चंद्रकांत पुलकंटवार, विजय गावंडे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर शिरसाठ आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमास विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक, मार्गदर्शक, एकनाथ पाटील अकॅडमीचे प्रतिनिधी व राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘खेलेगा भारत, जितेगा भारत’च्या घोषवाक्याने सामुदायिक रॅली
राष्ट्रीय क्रीडा दिन सप्ताहाच्या अनुषंगाने ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक तसेच एकनाथ पाटील अकॅडमीचे खेळाडू आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे अधिकारी-कर्मचारी अशा सुमारे ४५० खेळाडूंनी सहभाग घेतला. खेलेगा भारत, जितेगा भारत या घोषवाक्याने रॅली उत्साहात संपन्न झाली.
संपूर्ण कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमप्रमुख क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक चंद्रप्रकाश होनवडजकर, क्रीडा अधिकारी राहुल श्रीरामवार, संजय चव्हाण, हनमंत नरवाडे, इक्रम शेख, मोहन पवार, सुभाष धोंगडे, विद्यानंद भालेराव, चंद्रकांत गव्हाणे, यश कांबळे, सोनबा ओव्हाळ आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी यांनी केले, तर आभार क्रीडा अधिकारी संजय बेतीवार यांनी मानले.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *