घाटलाडकी परिसरात आगीच्या दोन घटना:संत्रा बागा जळाल्या, शेतकऱ्यांकडून नुकसानभरपाईची मागणी
![]()
घाटलाडकी परिसरात आगीच्या घटनांमुळे संत्रा बागांचे मोठे नुकसान झाले आहे. वीज वितरण प्रणालीतील बिघाडामुळे स्पार्किंग होऊन ठिणग्या पडल्या आणि गवत पेटल्याने आग लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. महसूल विभागाने या घटनांचा पंचनामा केला असून, शेतकऱ्यांच्या मागणीनुसार महावितरणकडे माहिती पाठवली आहे. गेल्या चार दिवसांतच दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरवाडी येथील शेतकरी मंगेश तर्हेकर यांच्या शेतात विजेच्या स्पार्किंगमुळे आग लागली. यात त्यांच्या संत्रा बागेला मोठी झळ पोहोचली असून, अनेक फळधारक झाडांचे नुकसान झाले आहे.तसेच, मौजा सांभोरा येथील शेतकरी जानराव लोखंडे यांच्या शेतात लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले. या आगीमुळे मुजीबुर रहमान यांच्या शेतातील संत्रा, सागवान आणि सीताफळाची झाडे जळून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व घटनांचे पंचनामे झाले असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी होत आहे. वीज वितरण कंपनीने जबाबदारी स्वीकारून नुकसानभरपाई द्यावी, तसेच वीज यंत्रणेची तातडीने देखभाल व दुरुस्ती करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
