प्रगतिशील शेतकरी:आंतरपिकातून निघाला खर्च, खडकाळ जमिनीवर फुलले 'डाळिंबाचे सोने'; जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याचा प्रयोग, दोन वर्षांत 25 लाख उत्पन्न

[ads1]


शेतीमध्ये निसर्गाची अवकृपा आणि पारंपरिक पिकांमधून होणारे अनिश्चित उत्पादन यावर मात करत भोकरदन तालुक्यातील वरुड बु. येथील दादाराव गणपत वाघ यांनी आपल्या प्रयोगशीलतेतून समृद्धीचा मार्ग शोधून काढला. केवळ दीड एकर खडकाळ जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि योग्य नियोजनाच्या बळावर त्यांनी डाळिंब बागेतून लाखांचे उत्पन्न घेण्याची किमया साधली. वाघ यांनी अवघ्या दीड एकर माळरानावर जालन्यातील शासकीय मान्यताप्राप्त नर्सरीतून डाळिंबाची रोपे आणून त्यांनी 620 झाडांची लागवड केली. शेततळ्याच्या पाण्याची साठवणूक, ठिबक सिंचन आणि फवारणी यंत्रांच्या योग्य नियोजनाने त्यांनी खडकाळ जमिनीतूनही लाखांचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. मित्र दीपक वराडे यांचे मार्गदर्शन या प्रवासात मोलाचे ठरले. तिसऱ्या वर्षी डाळिंबाचे पहिले उत्पादन हाती आले असून, त्यातून 11 लाखांची कमाई झाली. तर यंदाच्या हंगामात डाळिंब विक्रीतून 14 लाखांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. चिखली येथील व्यापाऱ्यांनी थेट शेतावर येऊन जाग्यावरच माल खरेदी केला. आंतरपिकातून भक्कम आर्थिक आधार डाळिंबाची बाग पूर्ण ताकदीने फळावर येण्यासाठी सुरुवातीची 2-3 वर्षे वाट पाहावी लागते. या काळात होणारा खर्च भागवण्यासाठी वाघ यांनी पहिल्या वर्षी मिरची व गोबीचे आंतरपीक घेतले. यातून त्यांना 3 लाख 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. यामुळे बागेच्या सुरुवातीचा 3.5 लाखांचा व्यवस्थापन, खते व छाटणीचा खर्च सहज भागला. उत्पन्न आणि खर्चाचा हिशोब असा बागेचा 3 वर्षांचा एकूण खर्च 3,50,000 (ड्रिप, यंत्रे, खते व छाटणी) झाला होता. त्या तुलनेत मिरची, गोबी व सोयाबीनच्या आंतरपिकातून 3,80,000 चे उत्पन्न मिळाले, तर दोन वर्षांच्या डाळिंब विक्रीतून मागील वर्षी 11 लाख व चालू वर्षी 14 लाख असे सर्व मिळून एकूण 28,80,000 जमा झाले. खर्च वजा जाता दादाराव यांना तब्बल 25,30,000 चा निव्वळ नफा मिळाला आहे. दादाराव यांच्या या प्रयोगशीलतेची माहिती मिळताच सध्या परिसरातील शेतकरी ही बाग पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत.
——————–
शेतकरी मोबाइल नंबर : 9637720363

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *