खतांचा प्रमाणपेक्षा जास्त साठा, विक्री नियंत्रणासाठी टास्क फोर्स तयार करा:जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांचे निर्देश
![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आवश्यक युरिया खताचा साठा उपलब्ध करण्याबाबतचे नियोजन करण्याबरोबरच प्रमाणापेक्षा जास्त खताची खरेदी तसेच बेकायदेशीर विक्री होत असलेल्या दुकानदार आणि ग्राहक यांची तपासणी करावी, दोषी आढळणाऱ्या साठेबाज यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनय गौडा जी .सी. यांनी बैठकीत दिले.जिल्हास्तरीय खतसाठा सनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील. उपविभागीय कृषी अधिकारी श्री आघाव, विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी उद्योग विकास महामंडळाचे रवींद्र पाटील, जिल्हा विपणन अधिकारी श्री राठोड. जिल्हा कृषि निविष्ठा महासंघाचे अध्यक्ष प्रकाश मुथा यांच्यासह आरसीएफ, कोरोमंडल, नॅशनल फर्टीलायझर लिमिटेड या खत कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२५-२६ मधील खताची मागणी, आवंठण, विक्री याबाबतचा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. यामध्ये युरिया ,डी.ए पी,एम.ओ पी, संयुक्त खते, एस.एस.पी अशा विविध प्रकारच्या खतांची उपलब्धता मागणी आणि कृषी आयुक्तांकडून मंजूर आवंठण याबाबतचा आढावा त्यांनी घेतला .जिल्ह्याला आवश्यक असणाऱ्या खत, युरिया खतसाठा बाबत प्रमाणापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी खतसाठा केला असेल किंवा त्याची विक्री दुकानदाराने केले असेल तर याची तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा खतसाठा नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्ह्यातील युरियाचा बफर्स साठा दहा हजार ५५० मेट्रिक टन असून डीएपी खताचा साठा १२०० मेट्रिक टन संरक्षित करण्यात आलेला आहे. शेतकरी धारण करत असलेल्या शेतीक्षेत्राच्या आवश्यकते पेक्षा जास्त अधिक खतसाठा खरेदी होत असेल किंवा एकाच व्यक्तीच्या नावावर अधिक प्रमाणात खतविक्री होत असेल अशा दुकानदार ,विक्रेते यांची तपासणी करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करावा.तपासणी अंति दोषी आढळणाऱ्या साठेबाज व्यक्ती आणि दुकानदारांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी दिले. तपासणी करत असताना कृषी विभागाने पोलीस प्रशासनाचे सहकार्य घ्यावे.दोषी आढळणाऱ्या दुकानदारांचा परवाना रद्द करण्याबरोबरच खतांच्या विक्रीवर प्रतिबंध करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या यादीनुसार त्यांनी खरेदी केलेले खताची खातरजमा टास्कफोर्स मार्फत करण्यात यावी .तालुका निहाय विविध खतांची उपलब्धता आणि वितरण यांचे नियोजन याबाबत जिल्हाधिकारी गौडा यांनी आढावा घेतला. जिल्ह्यातील कृषी उत्पादन आणि विकासाचा घेतला आढावा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात असणाऱ्या प्रमुख पीकपद्धती, फळपीक भाजीपाला, निर्यात होणारे उत्पादने याबरोबरच जिल्ह्यात न लागवडीखालील क्षेत्र व त्या अनुषंगाने कृषी विभागाने केलेल्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी घेतला. कापूस, मोसंबी, ऊस, सोयाबीन, या पिकाच्या उत्पादनासंदर्भातील क्षेत्रनिहाय माहिती घेतली तसेच जिल्ह्यामध्ये आवश्यक असणारा खतं आणि बी बियाणे यांच्या मागणीनुसार पुरवठा साठी केलेल्या नियोजनाबाबत आढावा घेतला. यामध्ये एकूण इ पॉस मशीन, खत पुरवठा त्याचप्रमाणे कृषी निविष्ठा विक्री केंद्र तपासणी ,गुणवत्ता नियंत्रण अभियानाअंतर्गत केलेला तपासण्या,कृषी विभागाअंतर्गत असलेल्या विविध कार्यालयाची कार्यपद्धती, खरीप हंगामाचे पूर्व नियोजन याबाबतच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी आढावा सादर केला.
