खरातने सांगितले मित्र जिवंतय, पण दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडला:शिवाजी सहाणेंनी सांगितला किस्सा; दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण
![]()
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव जाहीर केल्यानंतर माजी आमदार शिवाजी सहाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना खरातची भविष्यवाणी कशी फोल ठरली, याचा खुलासा केला आहे. आपला एक मित्र बेपत्ता असताना त्याच्या शोधासाठी आपण खरातशी संपर्क साधला होता. त्यावेळी खरातने तो मित्र सुखरूप असल्याचे सांगितले होते, मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्या मित्राचा मृतदेह सापडला, असे सहाणे यांनी नमूद केले. अंजली दमानिया यांनी आजच्या पत्रकार परिषदेत त्यांचे नाव घेतले होते. यावर आपण केवळ मित्राच्या चिंतेपोटी त्याच्याशी संपर्क आल्याचा दावा सहाणे यांनी केला आहे. शिवाजी सहाणे यांनी सांगितले की, 8-10 वर्षांपूर्वी माझा खरातसोबत परिचय झाला होता. तो नेमका कोणाच्या माध्यमातून झाला होता ते मला आठवत नाही, परंतु त्यातील काही ठळक गोष्टी आहेत, ज्यावेळी मी त्याचीशी संर्पक केला. त्यातील दोन दुर्दैवी घटना आहेत. एक चार वर्षांपूर्वी माझा एक मित्र घरातून निघून गेला होता, आणि तो सापडत नसल्याने आम्ही सर्व मित्रांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. तरी तो सापडेल असे काही वाटेना म्हणून, काही मित्रांनी असे सूचवले की, अशोक खरातला आपण विचारून बघू त्याला भविष्य कळते. पुढे शिवाजी सहाणे यांनी सांगितले की, त्यानंतर मग मी माझ्याच फोनवरून त्याचीशी संर्पक साधला होता. त्याने मला सांगितले की आमदार साहेब तुमचा मित्र सुखरूप आहे आणि तो दोन दिवसांनी परत येईल. पण त्यानंतर दोनच दिवसांनी मला माझ्या मित्राचा मृतदेह गोदावरी नदीत सापडला. तेव्हा आमच्या सर्व मित्रांचा खरातवरून विश्वास उडाला. मित्राच्या मुलाच्या शोधासाठी कॉल केला शिवाजी सहाणे यांनी खरातसोबतच्या संवादाचा आणखी एक किस्सा सांगताना स्पष्ट केले की, 3-4 महिन्यांपूर्वी माझ्या एका मित्राने सांगितले की त्याच्या मित्राचा मुलगा घरातून निघून गेला आहे. त्यामुळे खरातला विचारायचे आहे की तो नेमका कुठे आहे. तेव्हा मी माझ्या मित्राला म्हटलो की मला नाही वाटत त्याचा फार काही परिणाम होईल, कारण त्याला फार काही भविष्य कळते असे मला वाटत नाही. तेव्हा मी खरातला फोन केला, पण त्याने माझाही फोन उचलला नाही, पण त्यानंतर 10 मिनिटांनी त्याचाच मला फोन आला. तेव्हा तो मला म्हणाला आमदार साहेब बोला तेव्हा मी त्याला सर्व किस्सा सांगितला. तेव्हा खरात मला म्हणाला की त्या मित्राशी माझे बोलणे झाले आहे, दोन ते तीन दिवसांमध्ये त्याचा मुलगा घरी येईल, त्यासाठी मी त्याला फोन केला होता, असे सहाणे यांनी स्पष्ट केले आहे.
