Heatwave Alert | सावधान! अतिमहत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नका, प्रशासनाचा इशारा
Heatwave Alert | राज्यात सध्या हवामानात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी अवकाळी पाऊस तर कधी प्रचंड उष्णता, अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभाग (IMD) ने पुढील 5 दिवसांसाठी गंभीर इशारा जारी केला आहे. (Maharashtra Heatwave Alert)
पुढील काही दिवस महाराष्ट्रातील बहुतांश भागात तापमान 42 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अकोला, अमरावती यांसारख्या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तापमान आधीच 43 अंशांच्या पुढे गेले असून पुढील दोन दिवसांत ते 45 अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. संपूर्ण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तापमान 40 अंशांच्या वर गेल्याने उष्णतेचा तडाखा अधिक तीव्र झाला आहे.
याशिवाय विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देखील जारी करण्यात आला आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
Heatwave Alert | कोकणात ढगाळ वातावरण, अवकाळी पावसाची शक्यता :
कोकण भागात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा त्रास जाणवत होता. तापमान 36 ते 38 अंशांदरम्यान होते. मात्र आता वातावरणात बदल होऊन ढगाळ स्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra Heatwave Alert)
या बदलामुळे काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर पाऊस झाला तर आंबा आणि काजू पिकांना मोठा फटका बसू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
मालेगाव, नांदेड, नंदुरबारमध्ये उष्णतेचा तडाखा :
मालेगाव येथे तापमान 41 अंशांवर गेले असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. शहरातील रस्ते दुपारच्या वेळी ओस पडलेले दिसत आहेत.
नांदेड जिल्ह्यात उष्णतेमुळे केळीच्या बागांना फटका बसत आहे. पाण्याची कमतरता आणि वाढते तापमान यामुळे शेती संकटात सापडण्याची शक्यता आहे.
तसेच नंदुरबार येथे तापमान 41 अंशांवर पोहोचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने उष्माघात कक्ष सुरू करत उपाययोजना सुरू केल्या आहेत.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना :
– दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडणे टाळा
– भरपूर पाणी प्या
– हलके व सैल कपडे वापरा
– लहान मुले आणि वृद्धांची विशेष काळजी घ्या
