जिल्हा परिषदेचे सीईओ गांधींनी सुटीच्या दिवशी घेतली बैठक:गाव-खेड्यांतील योजनांच्या अंमलबजावणीची जाणून घेतली वास्तविकता
![]()
अमरावती: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी सुट्टीच्या दिवशीही जिल्ह्यातील सर्व १४ गटविकास अधिकाऱ्यांची (बीडीओ) बैठक घेतली. केंद्र आणि राज्य शासनाच्या विकास योजनांची गाव-खेड्यांमधील अंमलबजावणी आणि त्यांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. सीईओ गांधी यांनी बीडीओंकडून गाव-खेड्यांची सध्याची वास्तविकता आणि विविध लोकाभिमुख योजनांच्या अंमलबजावणीचे सूत्र समजून घेतले. सीईओंच्या दालनाशेजारील व्हीसी रूममध्ये ही बैठक पार पडली. बैठकीत मोदी आवास घरकुल योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पारधी आवास योजना, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान, स्वच्छ भारत मिशन, जल जीवन मिशन, पाणी टंचाई आणि विविध प्रलंबित प्रकरणांवर चर्चा झाली. संबंधित अधिकाऱ्यांना शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून लाभार्थ्यांपर्यंत वेळेत लाभ पोहोचवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढण्यावर भर देण्यास सांगितले. मेळघाट परिसरात सध्या आरोग्य सुविधांमधील उणीवा आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई हे प्रमुख प्रश्न ऐरणीवर आहेत. उन्हाळ्यात आदिवासी-कोरकूंना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्याने कुटुंबांचे स्थलांतर होते. या तातडीच्या उपाययोजनांची गरज लक्षात घेता, सुट्टी बाजूला सारून ही बैठक आयोजित करण्यात आली असावी. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, डेप्युटी सीईओ श्रीराम कुलकर्णी, बाळासाहेब रायबोले, मीमा मसतकर, समाज कल्याण अधिकारी ज्ञानोबा पुंड, लेखाधिकारी संजय नेवारे, सहायक गटविकास अधिकारी तुळशिराम चव्हाण, सुनील गवई यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.
