दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेला हिरवा झेंडा:तर ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ; ऑपरेशन मेट्रोमध्ये राज्य दुसऱ्या क्रमांकावर
![]()
मुंबईकरांसाठी, विशेषतः मिरा-भाईंदरमधील रहिवाशांसाठी एक आनंदाची बातमी असून वाहतूक कोंडीच्या समस्येतून आता त्यांची कायमची सुटका होणार आहे. दहिसर ते मिरा-भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेतील ‘दहिसर ते काशीगाव’ (टप्पा 1) आणि अंधेरी पश्चिम ते मंडाले मेट्रो 2 ब मार्गिकेतील ‘डायमंड गार्डन ते मंडाले’ (टप्पा 1) या दोन महत्त्वाच्या मेट्रो सेवांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. याचसोबत ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचे शुभारंभ करण्यात आले आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुल्या करण्यात आल्याने उपनगरातील प्रवासाचा वेग वाढणार असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले आहे. 2018 साली आपण याचे भूमिपूजन केले होते त्यानंतर मुंबई आणि मीरा भाईंदर यांना जोडणारी मेट्रो ही तयार करण्याचे काम सुरू झाले. मागच्या काळात शिंदे साहेब आणि मी याचा ट्रायल सुद्धा पाहिला होता. आज प्रत्यक्ष दहिसर पूर्व ते काशिगाव या 4.4 किमी टप्प्याचे काम पूर्ण केले आहे. मेट्रो 7 ला ही कनेक्टिंग मेट्रो झाली आहे. आता जो दूसरा टप्पा आहे, यात साईबाबा नगर ते सुभाषचंद्र बोस मैदान याचे देखील 96 टक्के पूर्ण झाले आहे. आमचा प्रयत्न असणार आहे की त्याचे देखील याच वर्षी उद्घाटन झाले पाहिजे. ऑपरेशनल मेट्रोमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, जवळपास 6 हजार 607 कोटी रुपये या प्रकल्पाला लागणार आहे. जिथे 2 तास लागायचे तिथे आता आपण 30 मिनिटांत पोहोचणार आहोत. आता कॅशलेस तिकीट आपण केले आहे. कार्ड देखील तयार केले आहे. आता 80 टक्के व्यवहार हा कॅशलेस चालू आहे. त्यामुळे आपले जे कार्ड आहे ते यशस्वी झाले आहे. हा प्रकल्प हरित प्रकल्प म्हणून गणला जाणार आहे. तसेच देशात ऑपरेशनल मेट्रोमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवर असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईतली मेट्रो आता मुंबई एमएमआर पर्यंत पुढे जात आहे. आता दूसरा टप्पा सुद्धा याच वर्षी पूर्ण होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि एमएमआर जोडण्याचा जो संकल्प होता तो साध्या होत आहे. ही मेट्रो दहिसरपासून मेट्रो 2ए आणि लाइन 1 सोबत कनेक्ट आहे. भविष्यात मेट्रो 7 आणि 7 ए द्वारा छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाला पण जोडतोय. त्यानंतर ही मेट्रो 3 ला जोडली जाणार आहे. त्यानंतर सुभाषचंद्र बोस पर्यंत जाणार आहे. त्याचे देखील काम सुरू आहे. मी मुख्यमंत्री असताना अडथळे दूर केले- एकनाथ शिंदे पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना याचे भूमिपूजन केले. त्यानंतर अडीच वर्ष मी मुख्यमंत्री असताना अडथळे दूर केले आणि आज पुन्हा फडणवीस मुख्यमंत्री असताना याला आपण हिरवा झेंडा दाखवला आहे. मेट्रो हे काम आपण अतिशय जलद गतीने करत आहोत. यामुळे रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल. पेट्रोल वाचेल. हे सरकार सर्वसामान्यांसाठी आहे. ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचे शुभारंभ दरम्यान, आजच ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या प्रकल्पाचे शुभारंभ करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होत्या. या बोगद्यामुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकारक होणार आहे. या प्रकल्पाचचा ‘नायक’ आणि अर्जुन या मशीनद्वारे कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून पाहता येणार आहे असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग आपण सुरू करणार आहोत. याची लांबी 11.84 किमी आहे. यातला जो बोगदा आहे त्याची लांबी 10.25 किमी आहे. आणि या ज्या मशीन आहेत या बोरिवलीकडून 5.75 किमी आणि ठाण्याहून 6.9 किमी अशा पद्धतीने या टनेलचे बोरिंग होणार आहे. 6 पदरी मार्ग आपल्याला मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यात 2 वाहतुकीच्या आणि 1 आपत्कालीन अशा 3 मार्गिका असणार आहेत. सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प एमएसआरडीसी कडे होता आता एमएमआरडीएला देण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे जो काही 90 मिनिटांचा वेळ लागतो तो वेळ केवळ 15 मिनिटांवर येणार आहे.
