भोंदू खरातची अघोरी पूजा – अजितदादांच्या अपघाताचा संबंध?:CDR काढल्यास अजित पवारांचा घातपात स्पष्ट होईल, अमोल मिटकरींचा दावा
![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भोंदू अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा अजित पवारांच्या विमान अपघाताशी कथित संबंध असल्याचा दावा केला आहे. भोंदू अशोक खरातचा जानेवारी महिन्यातील सीडीआर काढल्यास अजित पवारांचा अपघात की घातपात? हे स्पष्ट होईल, असे ते म्हणालेत. दरम्यान, सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्यानेच असा दावा केल्यामुळे याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली आहे. अजित पवार यांचे गत 28 जानेवारी रोजी झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले होते. तेव्हापासून त्यांच्या निधनाविषयी ना-ना प्रकारचे दावे केले जात आहे. त्यातच भोंदू अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर त्याचाही या अपघाताशी संबंध जोडला जात आहे. त्यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या एक दिवस अगोदर, अपघाताच्या दिवशी व अपघाताच्या दुसऱ्या दिवशी भोंदू खरातच्या बँक खात्यांवर प्रचंड व्यवहार झाल्याचा दावा केल्यामुळे या प्रकरणी व्यक्त केल्या जाणाऱ्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांनी उपरोक्त दावा केला आहे. नेमके काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी? अजितदादा विमान अपघात प्रकरण संदर्भात नराधम अशोक खरात व त्याच्या आश्रमात झालेल्या अघोरी पूजेचा संबंध असल्याची सर्वांना शंका होतीच.जानेवारी महिन्यात सर्वात जास्त SMS चौकशी च्या फेऱ्यात आले.या महिन्यातील खरातचे CDR काढल्यास दादांचा अपघात की घातपात? हे स्पष्ट होईल, असे अमोल मिटकरी म्हणालेत. रोहित पवारांनीही केलेत असेच आरोप उल्लेखनीय बाब म्हणजे विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही यापूर्वी अनेकदा भोंदू खरात व अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ते या प्रकरणी सोमवारी म्हणाले होते, अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी ‘समता पतसंस्थे’त भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती, भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमांनामधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का? यासंदर्भातील संशय अधिक गडद होत आहे. अजितदादांच्या घातपातासंदर्भात चौकशी करताना सीआयडीने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचा देखील तपास करायला हवा, असे ते म्हणाले. शेवटी पाहू काय म्हणाल्या अंजली दमानिया? अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी भोंदू अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित काही महत्त्वाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, समता नावाची एक पतसंस्था आहे. त्यात पैसे टाकले किंवा काढले की एसएमएस येतो. मी या संस्थेची पूर्ण माहिती काढली आहे. त्यात मला अनेक गोष्टी समजल्या. 27 जानेवारी रोजी म्हणजे अजित पवारांच्या निधनाच्या एक दिवस आधी, खरातच्या समता पतसंस्थेच्या खात्याचे 17 मेसेज आले होते. तद्नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशी (28 जानेवारी) 19 मेसेज आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी 29 जानेवारी 10, 30 जानेवारी 8, तर 31 जानेवारी रोजी 8 मेसेज आलेत. या व्यवहाराची मी एसआयटीकडे चौकशी करण्याची मागणी करणार आहेत, असे दमानिया यांनी म्हटले आहे.
