मुंबई-आग्रा महामार्गावर अपघाताचा थरार:लळिंग घाटात रेतीचा डंपर, कार आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण धडक; 5 जण ठार, 12 गंभीर

0
new-project-2026-05-25t094129805_1779682349.jpg




मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील लळिंग घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळीज हेलावून टाकणारा तिहेरी अपघात झाला. रेतीने भरलेला भरधाव डंपर, एक कार आणि मध्य प्रदेशातून आलेली प्रवासी ट्रॅव्हल्स बस यांच्यात झालेल्या या धडकेत ६ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १० ते १५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर घाटात मोठी खळबळ उडाली असून वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लळिंग घाटातून जात असताना रेतीने भरलेल्या एका डंपरवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्याने हा डंपर थेट राँग साइडला गेला आणि समोरून येणाऱ्या एका वाहनाला त्याने जोरदार धडक दिली. या अपघातानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि यंत्रणांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले होते. मात्र, त्याच वेळी मागून आलेल्या मध्य प्रदेशच्या एका भरधाव प्रवासी ट्रॅव्हल्स बसने आधीच अपघातग्रस्त असलेल्या डंपर आणि ट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली. ही दुसरी धडक इतकी वेगवान होती की ट्रॅव्हल्समधील तीन प्रवाशांसह एकूण ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. जखमींवर धुळ्यात उपचार अपघातानंतर लळिंग घाट परिसरात प्रवाशांच्या किंकाळ्या आणि आक्रोश ऐकू येत होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महामार्ग पोलिस आणि टोल नाक्यावरील मदत पथकाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. वाहनांचे पत्रे कापून जखमींना आणि मृतांना बाहेर काढण्यात आले. सर्व जखमींना तातडीने धुळे येथील शासकीय आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून, पोलिस सध्या मृतांची आणि जखमींची ओळख पटवण्याचे काम करत आहेत. मदतीला गेलेल्या टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू; संतप्त कर्मचाऱ्यांकडून टोल बंद या संपूर्ण घटनेला त्या वेळी वेगळे वळण मिळाले, जेव्हा अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील एका कर्मचाऱ्याचाही दुर्दैवी अपघात होऊन मृत्यू झाला. या घटनेमुळे टोल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला. संतप्त कर्मचाऱ्यांनी लळिंग टोल नाक्यावर तातडीने आंदोलन सुरू करत टोल वसुली पूर्णपणे बंद पाडली. “आम्हाला कोणतीही सुरक्षा नाही, विमा संरक्षण नाही, तरीही आम्ही जीव धोक्यात घालून महामार्गावरील अपघातग्रस्तांना मदत करतो. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आम्हाला आवश्यक सुविधा आणि सुरक्षा पुरवायला हवी होती,” असा थेट आरोप आंदोलक कर्मचाऱ्यांनी केला आहे. मृत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत, कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी तात्काळ सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. महामार्गावर लांबच लांब रांगा; वाहतूक विस्कळीत अपघात आणि त्यानंतर झालेल्या टोल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. घाटाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळावरून अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साहाय्याने बाजूला काढली असून, आंदोलक कर्मचाऱ्यांशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे आणि वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणी धुळे पोलिस अपघाताच्या नेमक्या कारणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed