प्रगतीशिल शेतकरी:“तिखट” प्रयोगाचे ”गोड" फळ, मिरची लागवडीतून 35 गुंठ्यांत 7 लाख कमाई; सटाण्याच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
![]()
निसर्गाचा लहरीपणा आणि पिकांवरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अनेकदा हवालदिल होतो. मात्र, नाशिक जिल्ह्यातील सटाणे तालुक्यातील गोराणे येथील सुनील जाधव या तरुण शेतकऱ्याने संकटावर मात करत यशाचा नवा मार्ग शोधला. मर आणि तेल्या रोगामुळे डाळिंबाची बाग उपटून टाकण्याची वेळ आलेल्या जाधव यांनी खचून न जाता मिरची लागवडीचा प्रयोग केला. केवळ ३५ गुंठे क्षेत्रात ७ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून त्यांनी शेतीतील आपली “तिखट’ जिद्द सिद्ध केली. जाधव यांच्या भागात डाळिंब हे मुख्य पीक. मात्र, गेल्या काही वर्षांत तेल्या आणि मर रोगामुळे बागांचे मोठे नुकसान होत आहे. खर्च करूनही उत्पन्न मिळत नसल्याने जाधव यांनी धाडसी निर्णय घेत डाळिंबाची बाग काढून तिथे मिरची लावण्याचे ठरवले. १८ मे २०२५ रोजी त्यांनी “क्लाऊज ६३००’ या वानाची ११ हजार रोपे दोन फूट अंतरावर बेड पद्धतीने लावली. दरम्यान, ज्या क्षेत्रात डाळिंबाची बाग रोगामुळे उपटून टाकावी लागली, त्याच जमिनीत मिरचीने भरघोस उत्पन्न दिले. डाळिंबाच्या तुलनेत कमी वेळात आणि कमी खर्चात हे यश मिळाल्याने परिसरात जाधव यांच्या प्रयोगाचे कौतुक होत आहे. जैविक खतांची “किमया’ या प्रयोगात जाधव यांनी रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवून जैविक पद्धतीवर भर दिला. त्यांनी एक टन गांडूळ खताचा वापर केला. तसेच, गांडूळ खत निर्मितीमधून मिळणारे “व्हर्मीवॉश’ (पोषक द्रव) ठिबक आणि फवारणीद्वारे पिकाला दिले. यामुळे रोपांची वाढ जोमदार झाली आणि मिरचीला चकाकी मिळाली. या दर्जेदार मिरचीला सुरतच्या बाजारपेठेत मोठी मागणी मिळाली, ज्यातून त्यांना लाखांचे उत्पन्न मिळाले. नियोजनाची जोड; सेंद्रिय शेतीचा तोड बदलत्या हवामानात पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन बाजारपेठेचा अचूक अंदाज घेणे ही काळाची गरज बनली आहे. सुनील जाधव यांनी बाजारपेठेचा शोध घेत भाजीपाला पिकाचे केलेले नियोजन आदर्श ठरले. विशेषतः रासायनिक खतांऐवजी गांडूळ खताचा वापर केल्याने जमिनीचा पोत सुधारतो आणि पिकाला नैसर्गिक दर्जा मिळतो. अशा सेंद्रिय प्रयोगांमुळे उत्पादनात शाश्वतता येते, कमी खर्चात भरघोस नफा मिळतो आणि शेती खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरते.दरम्यान, शेतीच्या याच भागात इतर शेतकरी साधारण एकरी दोन लाख रुपयाचे उत्पन्न घेतात. मात्र सुनील जाधव यांना अधुनिक पध्दतीने नियोजन करीत ३५ गुंठे क्षेत्रात सात लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. शेतकरी मोबाइल नंबर : 9921807958
