आंबेडकरी तत्त्वज्ञान हा जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग:ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत ताराचंद्र खांडेकर यांचे प्रतिपादन
![]()
अमरावती येथे ज्येष्ठ साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी आंबेडकरी तत्त्वज्ञान हे जागतिक चिंतनाचा अविभाज्य भाग बनले असल्याचे प्रतिपादन केले. आताच्या पिढीने हे तत्त्वज्ञान व्यवहारात आणण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. खांडेकर यांच्या गौरवार्थ आंबेडकरी विचार समितीतर्फे दोन दिवसीय साहित्यिक मेजवानीचे (संगीती) आयोजन करण्यात आले होते. या संगीतीचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे प्रसिद्ध लेखक-विचारवंत प्रा. डॉ. महेंद्र भवरे यांच्या हस्ते झाले. यावेळी का.रा. वाल्देकर, इ.मो. नारनवरे, नरेंद्र शेलार, बबन चहांदे आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटक प्रा. डॉ. भवरे यांनी आंबेडकरी चळवळ अत्यंत व्यापक असल्याचे नमूद केले. अशा चळवळीतील कार्यकर्त्यांच्या कार्याचे दस्तऐवजीकरण करणे महत्त्वाचे असून, ते नवीन पिढीला प्रेरणा देईल, असे ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात ताराचंद्र खांडेकर यांनी समकालीन प्रश्नांवर विस्तृत चर्चा केली. आंबेडकरी विचार हा सर्वकालिक कल्याणकारी असून, त्यातून नवीन समाज घडविण्याची प्रक्रिया सुरू होते, असे त्यांनी सांगितले. प्रमुख अतिथींनीही फुले-आंबेडकरांच्या विचारातून देशाचा उत्कर्ष साधता येईल, असे मत मांडले. या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत आंबेडकरी गझल जागर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. इ.मो. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नंदकुमार दामोदरे, सुदाम सोनुले, संजय घरडे, रोशन गजभिये, देवीलाल रौराळे, अतुल ढोणे, अनिल अघम आणि विनोद बागडे यांनी आपल्या गझल सादर केल्या. स्नेहल सोनटक्के यांनी सूत्रसंचालन केले, तर कुंदा सोनुले यांनी आभार मानले. दुसऱ्या दिवसाची सुरुवात कवी संमेलनाने झाली. गोविंद वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात बबन चहांदे, मोरेश्वर सहारे, नारायण थोरात, गौतम ढोके, गणेश लांडगे आणि संजय मोखडे यांनी आपल्या रचना सादर केल्या. त्यानंतर ‘खांडेकरांचे साहित्य, संस्कृती व चिंतन’ या विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादात प्रा. सुखदेव ढाणके आणि नरेंद्र शेलार यांनी आंबेडकरवादी अर्थशास्त्रीय व श्रमिक कल्याण विषयक विचारांचा परामर्श घेतला. प्रा. डॉ. गजानन बनसोड यांनी परिसंवादाचे संचालन केले, तर सुदाम सोनुले यांनी आभार प्रदर्शन केले.
