अडचणी अनंत असल्या तरी सत्कार्यासाठी लोक धावूनही येतात;निराधारांची आई प्रीती संतोष गर्जे यांचे प्रतिपादन


नांदेड (प्रतिनिधी )- शंभरावरून अधिक निराधार मुलांचे संगोपन करताना पायाभूत सुविधांचा अभाव होता, पावलापावलावर अपमान सहन करावा लागला, काट्याकुट्यांचा प्रवास करावा लागला , प्रसंगी भिक्षा मागून अनाथ मुलांचे संगोपन करावे लागले पण आम्ही चालत राहिलो. कारण अडचणी अनेक असल्या तरी सत्कार्यासाठी चांगले लोक धावून पण येतात. असे प्रतिपादन गेवराई येथील सहारा अनाथालयाच्या संचालिका निराधार लेकरांची आई प्रीती संतोष गर्जे यांनी केले. गोरठा तालुका उमरी येथील वरदानंद प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणाऱ्या काशीबाई फुलारी स्मृती नारायण पुरस्काराने सन्मानित झाल्यावर सत्काराला उत्तर देताना प्रीती गर्जे बोलत होत्या. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या सहाव्या मराठी साहित्य संमेलनात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संमेलनाध्यक्ष प्रा डॉ पी विठ्ठल, पाचव्या संमेलनाचे अध्यक्ष प्रभाकर साळेगावकर, सभापती शिरीष देशमुख गोरठेकर , सामाजिक कार्यकर्ते डॉ. उत्तम जाधव यांच्या उपस्थितीमध्ये त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रारंभी प्रतिष्ठानच्या वतीने साहित्यिक देवीदास फुलारी यांनी प्रास्ताविक केले. मानपत्राचे वाचन प्रा. धाराशिव शिराळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार आणि कथाकार राम तरटे यांनी केले. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक देवीदास फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या साहित्य संमेलनास स्वागताध्यक्ष अशोक फुलारी, संतोष गर्जे , दत्ता डांगे ,दिगंबर कदम ,शंकर वाडेवाले, विठ्ठल फुलारी ,प्रा. मुकुंद राजपंखे इत्यादी मान्यवरासह परिसरातील रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


Post Views: 141






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *