राज्यसभेच्या 7 जागांसाठी आठवले निश्चित, उर्वरित तीनवर तगडी स्पर्धा:वर्षा बंगल्यावर मॅरेथॉन बैठक; अंतिम यादीसाठी दिल्लीकडे मोर्चा




महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे सहा दिवस उरले असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या कोट्यातील चार जागांसाठी नावे ठरवण्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीला रविंद्र चव्हाण यांच्यासह सुमारे 12 प्रमुख नेते उपस्थित होते. राज्यातील संख्याबळ आणि सहयोगी पक्षांचा विचार करून संभाव्य उमेदवारांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेत पाठवले जाईल, अशी जोरदार चर्चा होती. तसेच विजया रहाटकर यांचे नावही जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत ऐनवेळी दोन नवी नावे पुढे आली. त्यात ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांचा समावेश आहे. या घडामोडींमुळे चार जागांपैकी तीनसाठी चुरस वाढली आहे. आठवले यांचे नाव निश्चित मानले जात असले, तरी उर्वरित तीन जागांवर तावडे, रहाटकर, दानवे आणि कराड यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम निर्णयासाठी पुढील पाऊल दिल्लीकडे वळणार आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण लवकरच दिल्लीला जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार असल्याचे समजते. केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करूनच उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांत भाजपच्या राज्यसभा उमेदवारांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीच्या संख्याबळाचा विचार करता सातपैकी सहा जागांवर विजयाची गणिते त्यांच्या बाजूने असल्याचा पक्षाचा दावा आहे. मविआतून शरद पवार यांच्या नावाची चर्चा दरम्यान, महाविकास आघाडीच्या गोटातही हालचाली सुरू झाल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज विधानभवनात मविआ आमदारांची बैठक होणार आहे. ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे हे राज्यसभेची एक जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. दुसरीकडे मविआतून राज्यसभेसाठी शरद पवार यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र ते सध्या रुग्णालयात उपचार घेत असल्याने ते निवडणूक लढवतील की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. सातपैकी सहा जागा महायुतीकडे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जाते. त्यासाठी काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून वेळ मागण्यात आला आहे. विधानसभेतील विद्यमान संख्याबळानुसार सातपैकी सहा जागा महायुतीकडे जाण्याची शक्यता असून, एक जागा महाविकास आघाडीकडे जाऊ शकते. त्यामुळे दोन्ही आघाड्यांमध्ये उमेदवारीवरून ताण वाढला आहे. पुढील काही दिवसांत नावांची घोषणा होताच राज्यसभेच्या लढतीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *