पुढील पिढ्यांना स्वराज्याच्या संघर्षाची प्रेरणा देणे गरजेचे:प्रा. शिवाजीराव काळुंगे यांचे प्रतिपादन‎




ब्रह्मपुरी, माचणूर येथे महाराणी येसूबाई यांचे भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प जाहीर करून ब्रह्मपुरी माचणूर येथे इ.स. १६८५ ते १६८९ या कालावधीत मुघलांची छावणी होती. त्या काळात महाराणी येसूबाई कैदेत होत्या आणि शाहू महाराज त्यांच्यासमवेत होते. याच ठिकाणी शाहू महाराजांचा विवाह झाला. हिंदवी स्वराज्याच्या इतिहासाशी निगडित या वारसास्थळाचे जतन करून पुढील पिढ्यांना स्वराज्याच्या संघर्षाची प्रेरणा देणे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे प्रतिपादन प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी व्यक्त केले. ते मंगळवेढ्यात धनश्री परिवाराच्या प्रशासकीय कार्यालयात शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. प्रारंभी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना प्रा. काळुंगे म्हणाले की, संतभूमी मंगळवेढ्याची ओळख अधिक बळकट करण्यासाठी संत चोखामेळा व त्यांच्या कुटुंबाच्या स्मारकासाठी धनश्री परिवार पुढाकार घेणार असून संत परंपरेचा वारसा जपत अध्यात्म, समता आणि मानवतेचा संदेश पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभाताई काळुंगे म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा आदर्श आत्मसात करून शिवचरित्र विचारात उतरवले पाहिजे, शिवचरित्र हे प्रेरणेचा अखंड झरा आहे. स्वराज म्हणजे केवळ सत्ता नव्हे, तर रयतेच्या हितासाठी उभारलेली न्याय, समानता आणि जबाबदारीची लोकाभिमुख व्यवस्था होय. विविध समाजघटकांना सोबत घेत उभारलेले शिवस्वराज्य आजही प्रेरणादायी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *