विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नाही:सुनेत्रा पवार स्थिर स्थावर होणे अन् त्यांची अध्यक्षपदी निवड करणे यालाच आमचे प्राधान्य – भुजबळ




सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा विषय आमच्यापुढे नसल्याच स्पष्ट केले आहे. रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे का? ही चर्चा आज, उद्या, महिना किंवा 2 महिन्यांनीही करता येईल. या प्रकरणी घाई करण्याची काहीच गरज नाही, असे ते म्हणालेत. उल्लेखनीय बाब म्हणजे अजित पवार यांचेच गत 28 जानेवारी रोजी झालेल्या एका विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आमची अजित पवारांशी विलीनीकरणाच्या मुद्यावर चर्चा सुरू होती व 12 फेब्रुवारी रोजी विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती असा दावा केला आहे. पण अजित पवारांच्या पक्षाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनीही सध्या आपल्या पक्षाचे प्राधान्य विलीनीकरणाला नव्हे तर सुनेत्रा पवार स्थिर स्थावर होण्याला असल्याचे स्पष्ट केले. रोज विलीनीकरण काय लावले? छगन भुजबळ पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, रोज विलीनीकरण, विलीनीकरण, विलीनीकरण ही काय चर्चा आहे? ही चर्चा आजही करता येईल, महिन्याने करता येईल किंवा दोन महिन्यानेही करता येईल. घाई करण्याचे कारण काय? सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यात. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक आहेत किंवा त्यांना जे योग्य वाटतील त्यांना बोलावून या मुद्यावर चर्चा करतील. शेवटी एवढा मोठा निर्णय दोन्ही बाजूंच्या लोकांशी चर्चा करूनच होईल. त्यावर एवढी घाई करण्याची गरज नाही. परंतु आज ते ठरलेच होते, ते झालेच पाहिजे असे म्हणण्याला काहीच अर्थ नाही. तिथे नवीन कॅप्टन आलेत. त्यांना बसू द्या. त्यांना काम करू द्या. त्यांना समजून घेऊ द्या. त्यानंतर त्या काय करायचे ते पाहतील. आज आमच्यापुढे हा विषय खरोखरच नाही. सुनेत्रा पवार स्थिर स्थावर होणे व त्यांची पक्षाच्या अध्यक्षपदी निवड करणे हाच आमच्यापुढे प्राधान्यक्रमाचा विषय आहे, असे ते म्हणाले. सुनेत्रा पवार अध्यक्ष 100 टक्के होणार छगन भुजबळ पुढे म्हणाले, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय 100 टक्के ठरला आहे. त्यामुळे याविषयी शंकाकुशंका घेण्याची काहीच गरज नाही. हा निर्णय झाला आहे. या प्रकरणी मोघम बोलण्यात काही अर्थ नाही. आम्ही कॅप्टन नेमले आहेत. ते विचार करतील. तेच पाहतील काय करायचे ते. ते आमदारांचीही बैठक घेतली. 3-4 दिवसांनी शपथविधी घेतला तर फार घाई झाली असे म्हणायचे आणि दुसरीकडे पहिल्या दिवसापासून विलीनीकरणाची चर्चा घडवून आणायची ही घाई नाही का? रोज तेच – तेच सुरू आहे. थोडे थांबले पाहिजे. पत्रकारांनी यावेळी त्यांना तुमच्या पक्षाकडून शरद पवारांच्या पक्षाला काही प्रस्ताव दिला जाणार आहे का? असा प्रश्न केला. त्यावर भुजबळांनी अशा हायपोथिटिकल प्रश्नांना माझ्याकडे उत्तर नसल्याचे ठणकावून सांगितले. नरहरी झिरवाळ यांची केली पाठराखण छगन भुजबळांनी यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या खात्यात घडलेल्या लाचखोरीच्या प्रश्नावरही भाष्य केले. ते म्हणाले, आता हे प्रकरण पोलिसांकडे गेले आहे. पोलिस त्याची चौकशी करतील. गृह खाते, सीएम, डीसीएमपर्यंत काय खरे, काय खोटे ही गोष्ट जाईल. नरहरी झिरवाळ यांनी स्वतःच या प्रकरणात आपला हात असल्याचे सिद्ध झाले तर राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका चूक आहे. ऑफिस व मंत्रालयात अनेक लोक काम करतात. त्यामुळे कुणी काय केले त्याच्याशी काय संबंध आहे? या प्रकरणी पोलिस चौकशीमार्फत योग्य ती स्थिती स्पष्ट होईल. नरहरी झिरवाळ या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यास गेले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटण्यास गेले त्याची मला माहिती नाही. त्यांच्या विभागाचे काही काम असेल, असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *