![]()
डोंबिवलीजवळील खोणी पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये आज (सोमवार, ९ फेब्रुवारी २०२६) सकाळी काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या एका ७ वर्षांच्या चिमुरडीवर चक्क १० ते १५ भटक्या कुत्र्यांच्या कळपाने जीवघेणा हल्ला केला. सोसायटीच्या सुरक्षारक्षकाने वेळेत धाव घेतल्यामुळे या मुलीचे प्राण थोडक्यात वाचले आहेत. आज सकाळी ७:३० ते ८ च्या सुमारास ही घटना घडली. ती ७ वर्षांची मुलगी आपल्या शाळेच्या बससाठी सोसायटीच्या आवारातून जात होती. यावेळी तिथे कळपाने बसलेल्या कुत्र्यांच्या नजरेत ही मुलगी पडली आणि क्षणात १० ते १५ कुत्रे तिच्या दिशेने धावून आले. कुत्र्यांचा कळप अंगावर येताच मुलगी प्रचंड घाबरली आणि बचावासाठी पळू लागली. यामुळे कुत्रे अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी तिचा पाठलाग करून तिला वेढले. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या मुलीने मोठ्याने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. सुरक्षारक्षक आला वेळेवर धावून मुलीचा किंचाळण्याचा आवाज ऐकताच परिसरात तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने क्षणाचाही विलंब न लावता हातात लाठी घेऊन त्या दिशेने धाव घेतली. त्याने लाठी फिरवून आणि कुत्र्यांवर ओरडून त्यांना हुसकावून लावले. सुरक्षारक्षकाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे कुत्र्यांनी मुलीचा पिछा सोडून, तेथून धूम ठोकली. त्यामुळे ती मुलगी सुखरूप वाचली. या हल्ल्यात मुलगी शारीरिकदृष्ट्या गंभीर जखमी झाली नसली, तरी या भीषण अनुभवामुळे ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे. नागरिकांचा संताप पलावा सारख्या सुसज्ज आणि महागड्या टाऊनशिपमध्ये कुत्र्यांचा एवढा सुळसुळाट झाल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका भटक्या कुत्र्यांच्या नसबंदी आणि त्यांना पकडण्याबाबत उदासिन असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सोसायटीच्या आवारात मुले सुरक्षित नसतील, तर सुरक्षिततेचे दावे काय कामाचे? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असून स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी सुरू आहे.
शाळेत जाणाऱ्या चिमुरडीवर 10-15 कुत्र्यांचा हल्ला:सुरक्षारक्षकामुळे वाचले प्राण, डोंबिवलीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना; VIDEO
