RSSच्या कार्यपद्धतीचे स्पष्टीकरण देताना मोहन भागवतांकडून बायबलमधील संदर्भ:म्हणाले – संघ कोणाला नष्ट करण्यासाठी नाही, तर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी!




मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये आयोजित ‘संघ प्रवासाची १०० वर्षे: नवी क्षितिजे’ या व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका, राजकारण आणि हिंदू धर्मावर अत्यंत स्पष्ट आणि महत्त्वपूर्ण भाष्य केले. “बायबलमध्ये एक वाक्य आहे, जे संघाच्या बाबतीतही तंतोतंत लागू पडते – ‘संघ हॅज कम टू फुलफिल, नॉट टू डिस्ट्रॉय’ (संघ पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आला आहे, नष्ट करण्यासाठी नाही). सर्व चांगल्या कामांची पूर्णता ज्या माध्यमातून होईल, ते कार्य करण्याची संघाची कार्यपद्धती आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. भाजप आणि संघातील फरक स्पष्ट अनेकदा भाजप आणि संघ यांना एकच मानले जाते, त्यावर डॉ. भागवत यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “अनेक लोक म्हणतात की नरेंद्र भाई प्रधानमंत्री आहेत म्हणजे आर.एस.एस. आहे. ते प्रधानमंत्री आहेत, पण त्यांचा ‘भाजप’ हा राजकीय पक्ष वेगळा आहे. तो पक्ष संघाचा नाही. भाजपमध्ये अनेक स्वयंसेवक आहेत आणि ते प्रभावी देखील आहेत. मात्र, समाज संघटित करण्याचे कार्य इतके व्यापक आहे की, ते झोकून देऊन करावे लागते. हे काम करणाऱ्याला इतर कोणत्याही कामासाठी सवड उरत नाही.” संघाला लोकप्रियता आणि सत्ता नको “संघाला कोणाशी स्पर्धा करायची नाही किंवा लोकप्रियता आणि सत्ताही नको आहे. केवळ देशाच्या भल्यासाठी होणारी सर्व कामे व्यवस्थित व्हावीत, यासाठी संघ आपुलकीच्या भावनेने कार्य करतो,” असेही मोहन भागवत यांनी स्पष्ट केले. देशात ‘चार प्रकारचे हिंदू’ डॉ. भागवत यांनी आपल्या भाषणात हिंदू समाजाचे चार वर्गांत वर्गीकरण करत एक महत्त्वाचा सामाजिक आरसा दाखवला. ते म्हणाले, “भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत. पहिला हिंदू हा अभिमानाने आपण हिंदू असल्याचे सांगतो. दुसरा हिंदू हा मी हिंदू आहे तर मग त्यात काय झालं? यात अभिमानाची बाब काय आहे? असे म्हणतो. तिसरा हिंदू हा स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही मला घरात विचाराल तरच मी हिंदू असल्याचे सांगेन असं म्हणतो. चौथा हिंदू हा आपण हिंदू असल्याचेच विसरून गेला आहे. किंवा तो हिंदू असल्याचे त्याला विसरून जाण्यास भाग पाडण्यात आले आहे.” भारतातील मुस्लीम आणि ख्रिश्चन हे भारतीयच हिंदू धर्मावर भाष्य करताना सरसंघचालक म्हणाले की, “भारताचा ‘सनातन’ स्वभाव कधीच बदलणार नाही. ऋषी-मुनींनी सांगितल्याप्रमाणे ‘सगळे आपलेच आहेत’ ही संघाची धारणा आहे. आपण विश्वगुरू होणार आहोत. भारतातील मुस्लीम आणि ख्रिश्चन हे भारतीयच आहेत. आपल्याला कोणालाही मागे सोडायचे नाही, तर सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. एकट्याला राहायचे असेल तर कोणत्याही नियमांची गरज नसते. जेव्हापासून सृष्टी आहे तेव्हापासून धर्म आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *