वेळापूर पोलिस ठाण्यात 'पवार' गटाचा एल्गार!:कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी खासदार-आमदारांचे ठिय्या आंदोलन, दोन तासांनंतर माघार




जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. या दरम्यान, सोलापूरच्या वेळापूरमध्ये मात्र मतदानाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. पोलिस अधिकाऱ्याने एका तरुणाला केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट पोलिस ठाण्यात बेमुदत आंदोलन पुकारले. अखेर संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आश्वासन मिळाल्यानंतर दोन तासांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले. वेळापूर येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी निलेश (मंगेश) तुपे या तरुणाला मारहाण केल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला. मतदानाच्या दिवशीच ही घटना घडल्याने राजकीय वातावरण तापले. आपल्या कार्यकर्त्याला विनाकारण लक्ष्य केले जात असल्याचे पाहून खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी थेट वेळापूर पोलिस ठाणे गाठले आणि तिथेच ठिय्या मांडला. पोलिस भाजपच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप आंदोलनादरम्यान माध्यमांशी बोलताना खासदार आणि आमदारांनी स्थानिक प्रशासनावर गंभीर आरोप केले. वेळापूर पोलिस ठाणे आणि येथील अधिकारी सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली काम करत आहेत. विरोधकांच्या कार्यकर्त्यांना जाणूनबुजूण त्रास दिला जात असून निवडणुकीच्या प्रक्रियेत अडथळा आणला जात आहे, असे ते म्हणालेत. पोलिसाच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर माघार पोलिस ठाण्यातील हे नाट्य सुमारे दोन तास चालले. कार्यकर्ते आणि नेत्यांचा वाढता दबाव पाहून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. संबंधित सहाय्यक पोलिस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांची तात्काळ बदली करून त्यांना निलंबित करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. या प्रकरणाचा सखोल तपास करून त्याचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे (SP) पाठवला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले. त्यानंतरच नेत्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. झेडपी-पंचायत समितीसाठी राज्यभरात शांततेत मतदान दरम्यान, १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेच्या ७३१ गटांसाठी व पंचायत समितीच्या १,४६२ गणांसाठी असे एकुण ७,४३८ उमेदवार रिंगणात आहेत. सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये लहान मुलांना मतदान यंत्रापर्यंत नेल्याच्या गंभीर प्रकरणांची निवडणूक आयोगाने दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना संबंधितांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना वगळता उर्वरित राज्यात प्रक्रिया शांततेत पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *