![]()
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्यावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनानंतर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर आता पक्षाच्या अध्यक्ष पदावरून जोरदार चर्चा रंगली आहे. त्यात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी एका मुलाखतीत प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष ठरल्याचे म्हटले होते. त्यानंतर यावरून राजकारण काहीसे तापल्याचे पाहायला मिळत आहे. आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी देखील प्रतिक्रिया देत थेट सुनील तटकरेंना सवाल केला आहे. पियुष गोयल यांच्याकडून मुलाखतीत बोलताना प्रफुल्ल पटेल यांचे नाव अनावधानाने आल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. यावर भरत गोगावले यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले, अनावधानाने नाव येतेच कसे? असा सवाल करत गोगावले यांनी पुन्हा एकदा तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. रायगडमध्ये गोगावले आणि तटकरे यांचा वाद सर्वश्रुत आहे. अनावधानाने कसे नाव येते? भरत गोगावले म्हणाले, पूर्वकल्पी ठरलेले असताना असे अनावधानाने कसे नाव येते? अजित दादा निघून गेल्याला अजून 12 दिवस देखील झाले नाहीत. तोवरच सगळ्या पदांच्या नेमणूक सुरू झाल्या, असे म्हणत गोगावले यांनी टीका केली आहे. सुनील तटकरे यांनी एका मुलाखतीत बोलताना पियुष गोयल यांच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव अनावधानाने आल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यावरून गोगावले यांनी टीका केली आहे. दरम्यान, पियुष गोयल यांनी केलेल्या विधानानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील ट्विट करत टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, राष्ट्रवादी कॉंग्रेस या मराठमोळ्या पक्षाचा अध्यक्ष कोणीही पाटील असावा, पटेल नसावा, असे म्हणत त्यांनी त्यांची स्पष्ट भूमिका मांडली होती. सुनील तटकरेंची रायगडमध्ये सभा अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची रायगडमध्ये पहिली सभा संपन्न होत असून रायगडच्या इंदापूर येथे जिल्हा परिषद निवडणुकांसाठी प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजितदादांची राष्ट्रवादी पुन्हा कामाला लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रफुल्ल पटेलांचे नाव अनावधानाने येतेच कसे?:भरत गोगावलेंचा सुनील तटकरेंना सवाल; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून वाद पेटला
