![]()
“आज महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनातील काळा दिवस आहे. अजित पवार यांच्यासारखा कार्यक्षम आणि रोखठोक नेता आपल्यातून निघून गेला आहे. त्यांच्याशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण आता ‘बेचव’ आणि ‘आळणी’ होईल. त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच राहिले,” अशा अत्यंत भावूक शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. संजय राऊत म्हणाले, आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुंबईतून बारामतीला घेऊन जाणाऱ्या विमानाच्या अपघाताची बातमी कळली, तेव्हा आम्ही सगळे प्रार्थना करत होतो की अशी कोणत्याही प्रकारची बातमी कानावर येऊ नये आणि अजित पवार सहीसलामत अपघातातून बाहेर यावेत. पण दुर्दैवाने धक्कादायक आणि दु:खद बातमी आमच्या कानावर आली. अजित पवार यांच्याशिवाय महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारण बेचव आणि आळणी होईल. त्यांचे व्यक्तिमत्व दिलखुलास, रोखठोक, कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा नेता असे होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजित पवारांच्या कामाची पद्धत, प्रशासनावरची पकड या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या मनात कायम राहतील. बारामती आणि त्यांचे एक नाते होते आणि त्याच बारामतीत त्यांना मृत्यू यावा, हा विचित्र योगायोग आहे. अजित पवारांना कधी श्रद्धांजली वाहावी लागेल, असे कधीही मनात आले नाही. शरद पवारांनी त्यांना राजकारणात आणले आणि नंतर गेल्या दोन अडीच वर्षांपासून त्यांनी महाराष्ट्रात शरद पवारांशिवाय राजकारण सुरू केले. त्या राजकारणाचा असा अकाली अंत होईल, असे कोणच्याही ध्यानीमनी नव्हते. अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून अजित पवारांचा नावलौकिक होता. त्यांना मिळालेले प्रत्येक पद हे राजकारणासाठी वापरलेच, पण कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी आणि विकासासाठी देखील वापरले. त्यांच्या बोलण्यात कधी राग किंवा चिड आली, ती पटकर एखादे विनोदी वाक्य टाकून, ते संपूर्ण वातावरण हसते खेळते ठेवण्याची त्यांची कसब होती, असे संजय राऊत म्हणाले. संजय राऊत म्हणाले, अजित पवारांनी त्यांच्या पद्धतीचे राजकारण केले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ते उपमुख्यमंत्री होते. कॅबिनेटला पूर्ण तयारी करून नेणारे मंत्री अजित पवार होते, असे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना म्हणायचे. अजित पवारांना राज्याच्या प्रश्नांचा विशेषत: पाटबंधारे, पाणी यासंदर्भात अभ्यास पक्का होता. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे विशेष काम राहिलेले आहे. संजय राऊत म्हणाले, आज महाराष्ट्र खरोखर दु:खात आहे. महाराष्ट्रवर कोणते संकट आलंय की महाराष्ट्राचे काय ग्रह फिरलेत माहीत नाही. गेल्या काही काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणातील असे अनेक प्रमुख नेतृत्व काळाने आपल्यापासून हिरावून नेते. विलासराव देशमुख, गोपिनाथ मुंडे आणि आता अजित पवार गेले. संजय राऊत म्हणाले, अजित पवार विक्रमी संख्येने पाच ते सहा वेळा उपमुख्यमंत्री झालेत. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाले असते, तर महाराष्ट्राला एक उत्तम कार्यक्षम मुख्यमंत्री मिळाला असता. पण ते त्यांच्या दुर्देवाने मुख्यमंत्री होऊ शकले नाही. आज भीषण विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला. महाराष्ट्राला आणखी काय पाहावे लागणार काही सांगता येत नाही. मी शिवसेना परिवारतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहतो. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सुद्धा अस्वस्थ आणि शोकात आहेत. पवार आणि ठाकरे कुटुंबाचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते, असे संजय राऊत म्हणालेत.
अजितदादांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण 'बेचव' आणि 'आळणी:मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न अधुरेच राहिले! संजय राऊत यांची भावूक प्रतिक्रिया
