![]()
महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना पक्ष व धनुष्यबाण प्रकरणाच्या सुनावणीसाठी आता सर्वोच्च न्यायालयाने आता 18 फेब्रुवारी ही नवी तारीख दिली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीनंतरच सुनावणी होईल हे स्पष्ट झाले आहे. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या नेतृत्वातील खंडपीठाने शिवसेनेची सुनावणी 21 व 22 जानेवारी रोजी सलग 2 दिवस घेण्याचे निश्चित केले होते. पण 21 तारखेला सुप्रीम कोर्टाने ऐनवेळी अरावली पर्वताचे प्रकरण हातावर घेतल्यामुळे या प्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. त्या दिवशी या प्रकरणाची सुनावणी 23 जानेवारी रोजी होईल असे सांगण्यात येत होते. पण त्या दिवशीही हे प्रकरण बोर्डावर आले नाही. अखेर आज सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण 18 फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी हाती घेतले जाईल हे स्पष्ट केले आहे. सु्प्रीम कोर्टाच्या संकेतस्थळावर ही तारीख नमूद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणाची सुनावणी ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याअगोदर घेण्याची मागणी केली होती. पण कोर्टाने त्याकडे दुर्लक्ष करत ही सुनावणी या निवडणुकांचा निकाल घोषित झाल्यानंतर जवळपास 10 दिवसांनी घेण्याचे निश्चित केले आहे. काय आहे वादाचे नेमके प्रकरण? शिवसेना पक्षात 2022 च्या मध्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उभी फूट पडली होती. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगने शिंदे यांच्या नेतृत्वातीलच आमदारांच्या बंडखोर गटाला शिवसेना पक्ष हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एका याचिकेद्वारे या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनीही एका स्वतंत्र याचिकेद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या एका निर्णयाला कोर्टात आव्हान दिले आहे. त्यावरही अद्याप ठोस सुनावणी झाली नाही. सुप्रीम कोर्ट या प्रकरणाशी संबंधित सर्वच मुद्यांवर एकत्रित सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण मागील 3 वर्षांपासून या प्रकरणी कोणतीही ठोस सुनावणी झाली नसल्यामुळे ठाकरे गटाने वारंवार नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी सध्या केवळ ‘तारीख पे तारीख’ सुरू आहे. संजय राऊत यांनी केली होती टीका उल्लेखनीय बाब म्हणजे सरन्यायाधीश सूर्य कांत एका कार्यक्रमाच्या निमित्ताने 2 दिवसांपूर्वी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवारही उपस्थित होते. या दोघांनीही सरन्यायाधीशांचे स्वागत केले होते. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या कार्यक्रमावर निशाणा साधत शिवसेना प्रकरणाचा निकाल लागल्याची उपरोधिक टीका केली होती. धनुष्य बाण आणि घड्याळाचा निकाल लागला! न्यायदेवते त्यांना क्षमा कर! हे राम, असे ते म्हणाले होते.
आता ZP निवडणुकीनंतर शिवसेना खटल्याची सुनावणी:सुप्रीम कोर्टाने 18 फेब्रुवारीची तारीख केली निश्चित; पण फैसला कधी? सर्वांचा प्रश्न
