![]()
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. पुण्यात गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिल्यावरून सुरू असलेल्या वादात अजित पवारांनी ज्यांच्याकड
.
पुणे महानगरपालिका निवडणुकीत ‘गुन्हेगारी’ आणि ‘राजकारण’ यावरून सुरू असलेल्या वादात आता नवीन वळण आले आहे. ज्या उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे अजित पवारांवर टीका होत होती, ते उमेदवार आपले नसून मित्रपक्ष असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता सचिन खरात यांनीच या निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने अजित पवारांची मोठी अडचण झाली आहे.
नेमके काय म्हणाले सचिन खरात?
सचिन खरात यांनी पुणे महापालिका निवडणुकीतून माघार घेताना अजित पवार गटावर गंभीर आरोप केले आहेत. “मी सन्मानपूर्वक जागा मिळाव्यात या अपेक्षेने अजित पवारांसोबत गेलो होतो. मात्र, तशा जागा आम्हाला मिळाल्या नाहीत. त्यामुळे मी आणि माझा पक्ष या निवडणूक प्रक्रियेतून पूर्णपणे बाहेर पडत आहोत. आता कोणत्याही प्रभागात आमच्या पक्षाचा कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा नसेल,” असे सचिन खरात यांनी स्पष्ट केले.
आंबेडकरी विचारांशी तडजोड नाही
आपल्या भूमिकेचे समर्थन करताना सचिन खरात यांनी वैचारिक भूमिका स्पष्ट केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर माझा पक्ष चालतो. त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन मी कोणतेही चुकीचे काम करणार नाही. राजकारणात दोन पावले मागे आलो तरी चालेल, पण तत्त्वांशी तडजोड करणार नाही,” असे सांगत त्यांनी अजित पवारांना एक प्रकारे घरचा आहेरच दिला आहे.
गुन्हेगार उमेदवारांची जबाबदारी आता कोणावर?
पुण्यातील आंदेकर टोळी आणि इतर कुख्यात टोळ्यांच्या सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘एबी फॉर्म’ भरल्याने अजित पवारांवर चौफेर टीका झाली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना अजित पवार म्हणाले होते की, “आम्ही कोणत्याही गुन्हेगाराला उमेदवारी दिलेली नाही. सचिन खरात यांच्यासोबत आमची युती असल्याने त्यांनी त्यांच्या कोट्यातील जागांवर कुणाला उमेदवारी द्यायची, हा त्यांचा अधिकार आहे.”
अजित पवारांनी या प्रकरणाचे खापर खरात गटावर फोडून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता सचिन खरात यांनी पाठिंबाच काढून घेतल्यामुळे, राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या त्या ‘गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या’ उमेदवारांची जबाबदारी आता थेट अजित पवारांवर आली आहे.
पुण्याच्या राजकारणात पेच वाढला
सचिन खरात यांच्या माघारीमुळे पुण्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकाकी पडण्याची शक्यता आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना दिलेले समर्थन आणि मित्रपक्षाने ऐनवेळी फिरवलेली पाठ, यामुळे महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
