![]()
नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात लूटमार आणि दरोड्यांच्या घटना ताज्या असतानाच, आता शालेय मुले पळवण्याच्या प्रयत्नामुळे ग्रामीण भाग हादरून गेला आहे. नांदगाव तालुक्यातील बेजगाव परिसरात सोमवारी सकाळी शाळेत जाणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा हात धरून त
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बेजगाव येथील दोन विद्यार्थिनी शाळेचा गणवेश घालून पायी शाळेत निघाल्या होत्या. जाधव वस्ती परिसरात त्या आल्या असता, हिसवळ बाजूकडून मोटारसायकलवर साधूच्या वेशातील दोन व्यक्ती त्यांच्याजवळ आल्या. मुलींना पाहून त्यांनी मोटारसायकल परत फिरवली आणि त्यांच्या दिशेने धावले.
भीतीपोटी दोन्ही मुली धावू लागल्या, मात्र त्यातील एक मुलगी थकल्याने जागीच थांबली. संधी साधून एका संशयिताने तिचा हात पकडला आणि तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोबत असलेल्या दुसऱ्या विद्यार्थिनीने मोठमोठ्याने आरडाओरडा सुरू केला. लोकांच्या भीतीने संशयितांनी मुलीचा हात सोडला आणि तिथून पळ काढला.
ग्रामस्थांची सतर्कता आणि आरोपींना अटक
त्याच वेळी गावातील मच्छिंद्र खाडे हे मोटारसायकलवरून जात असताना त्यांनी मुलींना शाळेत सोडले. भीतीमुळे मुलींनी तात्काळ घटना कुणालाही सांगितली नाही. नंतर त्या मुलींनी आपल्या वडिलांना फोन करून प्रकार सांगितला. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकांना हा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बेजगाव परिसरातील ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. सुरेश जगताप (रा. गोसावीवाडी, दत्तनगर, पहूर कसबे, जि. जळगाव) आिणि नारायण शिंदे (रा. बाबरनगर, अंबड, जि. जालना) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता
सध्या ग्रामीण भागात साधूच्या वेशात मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरत असल्याची अफवा आणि अशा घटनांमुळे खऱ्या साधूंनाही ग्रामस्थांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. या घटनेमुळे साधूच्या वेशामागे लपलेल्या विकृत प्रवृत्ती उघड झाल्या असून पालकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. नांदगाव पोलिसांनी या दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पालकांनी आपल्या पाल्यांना एकटे सोडू नये आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
