MNS Shock: Raj Thackeray’s Loyalist Santosh Dhuri to Join BJP Today | राज ठाकरेंचे कट्टर समर्थक संतोष धुरी भाजपच्या वाटेवर: मंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने फडणवीसांची भेट; दुपारी एक वाजता प्रवेश सोहळा – Mumbai News



मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, मनसेसाठी ही निवडणूक अधिकच आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. कालपर्यंत राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक आणि निष्ठावंत मनसैनिक म्हणून ओळखले जाणारे माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी भाजपमध्य

.

संतोष धुरी हे वॉर्ड क्रमांक 194 मधून यंदाच्या महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे यांच्यातील जागावाटपात हा वॉर्ड उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे गेल्याने मनसेकडून धुरी यांना उमेदवारी मिळू शकली नाही. या निर्णयामुळे ते नाराज असल्याची चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू होती. या पार्श्वभूमीवर सोमवारी संध्याकाळी संतोष धुरी यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो समोर येताच मनसेमध्ये अस्वस्थता पसरली आणि धुरी यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता अधिक ठळक झाली.

या घडामोडीनंतर मंगळवारी सकाळी संतोष धुरी यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मात्र, मनसे सोडण्यामागील सविस्तर कारणे सांगण्यास त्यांनी टाळाटाळ केली. तिकीट मिळालं नाही म्हणून मी नाराज आहे, असा प्रश्नच नाही, असे सांगत त्यांनी केवळ एका वाक्यात आपली नाराजी व्यक्त केली. मनसेत माझी कदर करण्यात आली नाही. गेल्या दोन दिवसांतच आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत, आपली पुढील राजकीय भूमिका दुपारी स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नितेश राणे यांच्याविषयी बोलताना संतोष धुरी यांनी विशेष उल्लेख केला. नितेश राणे हे आमच्या कोकणातील नेते आहेत. ते नेहमी माझ्या संपर्कात असायचे. मला जेव्हा काही काम असे, तेव्हा मी त्यांना भेटायचो. त्यांनी अनेक वेळा मदत केली आहे. काल संध्याकाळी ते खास माझ्यासाठी सिंधुदुर्गावरून मुंबईत आले, हे मला मनापासून चांगले वाटले, असे धुरी यांनी सांगितले. या विधानातून भाजपमधील नेतृत्वाकडून आपल्याला मिळालेल्या महत्त्वाची तुलना त्यांनी अप्रत्यक्षपणे मनसेतील वागणुकीशी केल्याचे दिसून येते.

मनसेतील अंतर्गत संवादाबाबत बोलताना धुरी यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या निर्णयानंतर पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने त्यांच्याशी संपर्क साधलेला नाही. मी राज ठाकरे यांच्याशी कोणतीही चर्चा केलेली नाही. हा निर्णय मी स्वतः घेतला आहे, असे ते म्हणाले. तसेच मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांच्याशी असलेल्या मैत्रीबाबत बोलताना, आज सकाळी घराबाहेर पडलो तेव्हा संदीप देशपांडे नेहमीप्रमाणे मित्रासारखे भेटले. त्यांनी पुढेही मैत्री ठेवली, तर ती राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. यावरून वैयक्तिक संबंध आणि राजकीय निर्णय वेगळे असल्याचा संदेश त्यांनी दिला.

राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख

संतोष धुरी यांच्या राजकीय वाटचालीकडे पाहिल्यास, ते अनेक वर्षांपासून दादर परिसरात मनसेची पताका खांद्यावर घेऊन सक्रिय होते. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. 2017 साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत त्यांनी मनसेकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. यंदा ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीमुळे पुन्हा एकदा निवडणुकीत संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. यासाठी त्यांचे घनिष्ठ मित्र आणि मनसेचे शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांनीही जोरदार प्रयत्न केले. मात्र जागावाटपात वॉर्ड क्रमांक 194 उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला गेल्याने त्यांच्या राजकीय आकांक्षांना मोठा धक्का बसला.

मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी दुहेरी धक्का

या वॉर्डमधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून निशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे संतोष धुरी यांचे निवडणूक लढवण्याचे स्वप्न पूर्णपणे भंगले. याच पार्श्वभूमीवर धुरी यांचा भाजप प्रवेश हा मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी दुहेरी धक्का मानला जात आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेना (उबाठा) नेत्या आणि माजी महापौर शुभा राऊळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता मनसेमधील महत्त्वाचा चेहरा भाजपमध्ये जाणार असल्याने महायुतीचे पारडे अधिक जड होत असल्याचे चित्र आहे.

दुपारी 1 वाजता अमित साटम यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष धुरी यांनी काल रात्री उशिरा मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर आज दुपारी 1 वाजता आमदार अमित साटम यांच्या उपस्थितीत त्यांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार आहे. मुंबई महानगरपालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. अशा निर्णायक टप्प्यावर मनसेला बसलेला हा धक्का निवडणूक रणधुमाळीत कोणते नवे राजकीय वळण आणतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *