![]()
द्वारकाशारदापीठाधीश्वर श्रीमद् जगद्गुरु शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या भव्य शोभायात्रेने पुण्यात श्रीमद् भागवत कथा ज्ञानसत्राचा प्रारंभ झाला. फुलांच्या पायघड्या, शंखनाद, भगव्या पताका, तुतारी आणि मृदुंगाच्या गजरात ही शोभायात्रा काढण्य
.
श्री घैसास गुरुजी वेदपाठशाळेच्या वर्धापनदिनानिमित्त वेदभवन श्रीकृष्ण नगरी येथे १२ जानेवारीपर्यंत या ज्ञानसत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला श्रीराम जन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष आणि श्रीमद् भागवत सेवा समितीचे अध्यक्ष आचार्य गोविंद देवगिरी महाराज, वेदभवनचे प्रधानाचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास आणि विश्वेश्वर घैसास उपस्थित होते.
पौड रस्त्यावरील शृंगेरी शारदा मठापासून शोभायात्रेला प्रारंभ झाला. श्रीरामाचा जयघोष करत ही शोभायात्रा पुढे सरकली. शोभायात्रा मार्गावर फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि सुवासिनींनी औक्षण केले. शृंगेरी मठात जगद्गुरुंचे स्वागत करण्यात आले.
शंकराचार्यांच्या हस्ते शृंगेरी मठातील देवतांचे पूजन करून ते भागवत ग्रंथासह भव्य रथात आरूढ झाले. आचार्य गोविंद देवगिरी महाराजांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शोभायात्रेस प्रारंभ झाला. सनई चौघडा वादन, बॅन्ड पथक, आळंदी येथील वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांची दिंडी, वैदिक शास्त्री आणि कोथरूड भागातील सनातन धर्माचे अनुयायी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. ही शोभायात्रा पौड रस्त्यावरून वेदभवन श्रीकृष्णनगरी येथे समाप्त झाली.
वेदभवन श्रीकृष्णनगरी येथे स्वामीजींचे स्वागत झाल्यानंतर त्यांनी आशीर्वचन दिले. यावेळी मार्गदर्शन करताना शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले की, वेदांचे रक्षण होणे आवश्यक आहे, कारण सनातन धर्म वेदांमुळेच सुरक्षित आहे. वेद हे सनातन धर्माचा प्राण आहेत आणि भागवत कथा हे वेदरूपी वृक्षाचे परिपक्व फळ आहे. भागवत कथा सर्वांची तृष्णा भागवू शकते आणि त्यातून आनंद प्राप्त होतो.
