![]()
पुणे महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांमध्ये बिनविरोध निवड झालेल्या नगरसेवकांची पदे रद्द करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी आम आदमी पक्षाने (आप) केली आहे. यासंदर्भात पुणे शहर ‘आप’चे अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला निवेदन
.
बेनकर यांच्या म्हणण्यानुसार, निवडणूक आयोगाने बिनविरोध निवड झालेल्या नगरसेवकांचे अहवाल मागवले असले तरी, सर्व बिनविरोध उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. सत्ताधारी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या महायुतीने विरोधी उमेदवारांना दहशत, दमदाटी करून तसेच लाखो ते कोट्यवधी रुपये देऊन माघार घेण्यास भाग पाडले असल्याचा आरोप ‘आप’ने केला आहे.
राज्याच्या इतिहासात प्रथमच महापालिका निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने सत्ताधारी पक्षाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामुळे निवडणुकीत ‘नोटा’ वापरण्याचा पर्यायही उरला नाही. पैसे आणि गुंडगिरीच्या जोरावर लोकशाही संपवण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी रचला असून, हे भारतीय लोकशाहीसाठी अत्यंत हानिकारक असल्याचे धनंजय बेनकर यांनी नमूद केले.
दरम्यान, पुणे शहराच्या समस्यांवरून माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांवरही ‘आप’ने टीका केली आहे. ‘आप’चे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी या वादाला ‘प्रचारकी नुरा कुस्ती’ असे संबोधले आहे.
किर्दत म्हणाले, “हतबल पुणेकरांच्या समस्या हा कोंबड्याच्या झुंजीसारखा मनोरंजनाचा प्रयोग नाही. त्यामुळे मोहोळ आणि अजित पवार यांनी एकमेकांवर आरोप करत पुणेकरांसाठी नुरा कुस्तीचे शो करू नयेत. जर पुणेकरांच्या समस्यांची एवढी काळजी होती, तर गेल्या आठ वर्षांमध्ये काय केले, याचा हिशोब द्यावा.”
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा कळस गाठल्याचा आरोप केला होता. निविदा रक्कम फुगवून कामे लाटली जातात, अगदी कचऱ्यातही भ्रष्टाचार केला जातो. महापालिका भ्रष्टाचाराने पोखरली गेली असून कर्जबाजारी झाली आहे, अशी टीका पवार यांनी केली होती.
यावर उत्तर देताना मुरलीधर मोहोळ यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी संपली पाहिजे, असे म्हटले होते. मात्र, राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी यादी पाहिली तर ते कोणत्या तत्त्वांमध्ये बसते, असा सवाल मोहोळ यांनी केला होता.
या वादामध्ये आता आम आदमी पार्टीने उडी घेतली असून, भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यातील चिखलफेक म्हणजे ‘नुरा कुस्ती’ असल्याची टीका केली आहे.
