Ajit Pawar Defends Gangsters Wives Nomination Pune BMC RPI Kharat | गुन्हेगाराने मर्डर केला, तर त्याचे खानदान दोषी नसते: गुंडांच्या घरात दिलेल्या उमेदवारीवर अजित पवार स्पष्टच बोलले, भाजपरही टीका – Pune News



पुणे महापालिका निवडणुकीसाठी कुख्यात गुंडांच्या घरातील सदस्यांना ‘घड्याळ’ चिन्हावर उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवारांना लक्ष्य केले होते. यावर आज अजित पवार यांनी प्रतिक्रिया देत, गुन्हेगाराने मर्डर केला तर त्याचं खानदान दोषी नसते, असे म्हणत

.

राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे महापालिका निवडणुकीत कुख्यात गुंड गजा मारणे याची पत्नी जयश्री मारणे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. गजा मारणे सध्या तुरुंगात आहे. तो आपल्या काळ्या कारवायांप्रकरणी कुख्यात आहे. एवढेच नाही तर राष्ट्रवादी कुख्यात गुंड बापू नायर याच्या पत्नीलाही उमेदवारी दिली आहे. याशिवाय कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची भावजय लक्ष्मी आंदेकर व सून सोनाली आंदेकर यांनाही राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ह्या उमेदवारी दिल्यामुळे अजित पवारांवर टीकेची झोड उठली आहे.

नेमके काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी स्पष्ट केले की, संबंधित जागा ही आरपीआयचे सचिन खरात यांच्यासाठी सोडण्यात आली होती. चिन खरात आणि सीताराम गंगावणे यांनी सांगितले की, त्यांचे अधिकृत चिन्ह पोहोचायला वेळ लागेल, त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चिन्हाची मागणी केली. मी माझ्या मित्रपक्षाला जागा दिली आहे. तिथे कोणाला उमेदवारी द्यायची हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मी माझ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार तिथे दिलेला नाही.

गुन्हेगाराच्या पत्नीचा काय दोष?

गुन्हेगारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यावरून होणाऱ्या टीकेवर अजित पवार यांनी अत्यंत रोखठोकपणे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, “जर एखाद्याने हत्या केली, तर त्याचे संपूर्ण कुटुंब त्याला जबाबदार आहे असे म्हणणे चुकीचे आहे. उद्या मी काही गुन्हा केला तर त्याच माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझा मुलांचा, मुलींचा किंवा सूनांचा काय दोष आहे? असं नाहीय. जर एखाद्याने हत्या केली तर त्याचं संपूर्ण खानदान त्याला जबाबदार आहे, असे म्हणण्याचे कारण नाही. ती विकृती असते. काही चुकीच्या गोष्टी असतात?” असे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

भाजपवर पुन्हा डागली तोफ

यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला चढवला. “भाजपच्या कारभाराला पुणेकर वैतागले आहेत. भाजपच्या कारभारावर पुणेकर राग, चीड व्यक्त करतील. पुण्याचे कारभारी बदला. त्रिकुटाकडे असलेली सत्ता माझ्याकडे द्या. राज्यात आणि केंद्रात भाजपची सत्ता आहे. पण पुण्याच्या कारभाऱ्यांकडे इच्छाशक्तीचा अभाव, पाठपुराव्याची क्षमता नाही”, अशी टीका अजित पवारांनी केली. “एकहाती सत्ता द्या, आमची प्रशासनावर पकड आहे. पुण्याचा पिंपरी चिंचवडप्रमाणे विकास करू,” असे अजित पवार म्हणालेत.

‘गुन्हेगारीकरण’ आणि ‘विकास’ दोन मुद्द्यांवर रणधुमाळी

दरम्यान, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता ‘गुन्हेगारीकरण’ आणि ‘विकास’ या दोन मुद्द्यांवरून रणधुमाळी अधिक रंगणार असल्याचे दिसून येत आहेत. अजित पवारांनी चेंडू आरपीआयकडे ढकलला असला तरी, ‘घड्याळ’ चिन्हामुळे विरोधक त्यांना घेरण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *