महानगरपालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपावरून नाराज इच्छुकांनी चांगलाच गोंधळ घातल्याचे मागील दोन-चार दिवसांपासून पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठी बंडाळी उफाळून आली आहे. उमेदवारी न मिळाल्याने संतप्त झालेल्या एका
.
नाशिकमध्ये भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत युती होऊ शकली नाही, उलट शिंदेंच्या सेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी हातमिळवणी करत भाजपला एकाकी पाडले आहे. मात्र, आता स्वतःच्याच पक्षात तिकीट वाटपावरून निर्माण झालेला असंतोष रोखताना नेत्यांची नाकी नऊ येत आहेत. नाशिकमधील प्रभाग क्रमांक ३१ मधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले शिवा तेलंग यांनी सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे. शिवा तेलंग यांनी तिकीट वाटपावरून पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिला असून, प्रमुख नेत्यांवरही गंभीर आरोप केलेत.
शिवा तेलंग पत्रात काय म्हणाले?
शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात माजी नगरसेवक सुदाम ढेमसे यांच्यासह इतर प्रमुख नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. २०२२ पासून प्रभाग ३१ मध्ये सक्रिय असूनही केवळ राजकीय वापर करून घेतला आहे. २९ डिसेंबरला कॅनडा कॉर्नर येथे एबी फॉर्मचे वाटप सुरू असताना मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण झाली. एबी फॉर्मसाठी पैशांची मागणी करण्यात आली आणि पैसे घेऊनच फॉर्म देण्यात आले. एकाच प्रभागात दोन जणांना एबी फॉर्म दिल्याने संभ्रम निर्माण झाला. हेमंत गोडसे, विजय करंजकर, जयंत साठे, राजू लवटे, आणि प्रवीण बंटी तिदमे यांसारख्या नेत्यांचा या प्रक्रियेत सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला.
पत्र पोस्ट केल्यानंतर तेलंग नॉट रिचेबल
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊनही स्थानिक पातळीवर वरिष्ठांच्या आदेशाला फेटाळण्यात आले. मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे. माझ्या आत्महत्येस सुदाम ढेमसे, विजय करंजकर, हेमंत गोडसे यांच्यासह आठ नेते जबाबदार राहतील, असेही शिवा तेलंग यांनी आपल्या पत्रात नमूद केले. हे पत्र पोस्ट केल्यानंतर शिवा तेलंग हे पत्नीसह ‘नॉट रिचेबल’ असून, कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलिसा प्रशासन त्यांचा शोध घेत असून या प्रकरणामुळे शिंदे गटातील तिकीट वाटप प्रक्रिया आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्री दादा भुसे यांची सारवासारव
पक्षातील या तीव्र नाराजीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “राजकीय जीवनात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची इच्छा असते. एका जागेसाठी १० इच्छुक असतील, तर कोणाला तरी एकालाच संधी द्यावी लागते. दुर्दैवाने काहींना संधी देता आली नाही, हे आम्ही स्वीकारतो. मात्र, ९५ टक्के शिवसैनिक माघार घेऊन कामाला लागले आहेत.” तसेच “नाशिक महापालिकेवर शिवसेनेचाच भगवा फडकेल,” असा विश्वास दादा भुसे यांनी व्यक्त केला.
