![]()
नागपूर महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 22 हा केवळ एक सर्वसामान्य प्रभाग नसून भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. कारण याच प्रभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी येथे वास्तव
.
निनाद दीक्षित असं या तरुणाचं नाव असून, तो संघाचा स्वयंसेवक राहिलेला आहे. प्रभागातील भाजप नगरसेवकांनी गेल्या काही वर्षांत निष्क्रियता दाखवली, मूलभूत विकास कामांकडे दुर्लक्ष केलं आणि केवळ दिखाऊ कामांवर भर दिला, असा थेट आरोप करत निनाद दीक्षितने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची उमेदवारी नागरिक समितीच्या माध्यमातून असून, तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक पक्षाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. संघ मुख्यालय असलेल्या प्रभागात भाजपच्या विरोधात उभा राहणं ही बाब राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
निनाद दीक्षितच्या मते, प्रभाग 22 मध्ये केवळ गट्टू बसवणे, टाईल्स लावणे आणि सिमेंटचे रस्ते बांधणे एवढाच विकास झाला आहे. मात्र लोकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न, सार्वजनिक सुविधा, सामाजिक पायाभूत कामे आणि दीर्घकालीन विकास योजना याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. संघाचे मुख्यालय असलेला हा प्रभागच जर दुर्लक्षित राहात असेल, तर इतर भागांची अवस्था काय असेल? असा सवाल तो उपस्थित करतो. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी नागपूरच्या जनतेला गृहीत धरल्याचा आरोपही तो करतो.
एका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना निनाद दीक्षित म्हणाला की, प्रभागाच्या राजकीय परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवण्याची गरज आहे. मात्र सध्या अस्तित्वात असलेले मोठे पक्ष हा बदल घडवू शकत नाहीत. तीन-चार टर्म नगरसेवक राहिलेले, साठ वर्षांचे नेते जर बाजूला सरकत नसतील, तर तरुणांना संधी कधी आणि कशी मिळणार? असा थेट सवाल त्याने उपस्थित केला. तरुणांनी केवळ प्रचारासाठी धावायचं, झेंडे उचलायचे आणि मतांसाठी वापरून घ्यायचं, पण निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्यायचं नाही, ही आजची राजकीय संस्कृती असल्याचं त्याचं म्हणणं आहे.
निनाद दीक्षितने आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. महाराष्ट्रात महाविद्यालयीन निवडणुका अनेक वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे तरुणांना राजकारणाची पहिली शाळा असलेला विद्यार्थी राजकारणाचा अनुभवच मिळत नाही. तरुणांनी जायचं तरी कुठे? राजकारणात प्रवेश कसा करायचा? असा प्रश्न तो विचारतो. याच पार्श्वभूमीवर, नागरिक समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवणं हा तरुणांसाठी एक पर्यायी मार्ग असल्याचं तो सांगतो. व्यवस्थेत बदल घडवायचा असेल, तर किमान एका प्रभागातून तरी लढा उभारता येतो, आणि तोच लढा आम्ही देत आहोत, असं त्याचं ठाम मत आहे.
आपली उमेदवारी बंडखोरी आहे का, या प्रश्नावर निनाद दीक्षित स्पष्ट भूमिका मांडतो. मी भाजपचा प्राथमिक सदस्य नाही. मी कधीही भाजपकडून उमेदवारी मागितलेली नाही. त्यामुळे ही बंडखोरी ठरू शकत नाही, असं तो सांगतो. मात्र, भाजपच्या कार्यपद्धतीविरोधात आणि नगरसेवकांच्या निष्क्रियतेविरोधात हा उठाव निश्चितच आहे, हे तो ठामपणे मान्य करतो. संघाकडून अधिकृत पाठिंबा असल्याचा दावा तो करत नाही, मात्र अनेक स्वयंसेवक शांतपणे आपल्या पाठीशी उभे असल्याचं तो सूचक शब्दांत सांगतो.
संघ मुख्यालय असलेल्या प्रभाग 22 मध्ये भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांसमोर निनाद दीक्षितने वेगळंच आव्हान उभं केलं आहे. हा केवळ एक निवडणूक लढा नसून पारंपरिक राजकारणाला प्रश्न विचारणारी चळवळ असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. तरुण नेतृत्व, नागरिक समितीचा प्रयोग आणि संघाच्या पार्श्वभूमीचा संदर्भ यामुळे ही निवडणूक नागपूरसह राज्याच्या राजकारणात लक्ष वेधून घेत आहे. प्रभाग 22 मधील मतदार या तरुण स्वयंसेवकाच्या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतात, हे निकालातून स्पष्ट होणार असलं, तरी भाजपसाठी हा प्रभाग यावेळी सहजसोप्या विजयाचा राहिलेला नाही, हे मात्र निश्चित.
